ICC T20 World Cup 2026 Suryakumar Rescues India as United States Threaten : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात गत टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडियाने USA च्या संघाला २९ धावांनी पराभूत करत यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारतीय संघाच्या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादवनं सिंहाचा वाटा उचलला. भारतीय संघाने हा सामना जिंकला असला तरी USA च्या संघाने एका क्षणी टीम इंडियाला टेन्शन देणारी कामगिरी करत यंदाचा हंगामही अवस्मरणीय करण्याच्या तयारीनं आल्याचे दाखवून दिले. USA च्या गोलंदाजांसमोर सूर्या सोडला तर कुणाचाही निभाव लागला नाही. या परिस्थितीत भारतीय कर्णधार टेन्शनमध्ये आला होता. सामन्यानंतर त्याने ही गोष्ट बोलून दाखवली. एवढेच नाही तर कारणं देत चुका झाकून चालणार नाही, ही गोष्टही त्याने मान्य केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामन्यानंतर नेमकं काय म्हणाला सूर्या?
ठराविक अंतराने विकेट पडत असताना दबाव होता का? असा प्रश्न त्याला पोस्ट मॅच प्रेझेंटेशनवेळी विचारण्यात आला होता. यावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, "खरं सांगायचं तर ७७ धावांवर ६ विकेट्स पडल्यावर किती दबाव होता हे माझं मलाच माहीत आहे. पण त्यावेळी माझा स्वतःवर विश्वासही होता. कारण याआधीही मी अशा परिस्थितीत फलंदाजी केली आहे. मुंबईतील आझाद मैदानासह क्रॉस मैदानावर खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून मीच ही परिस्थिती बदलू शकतो याची जाणीव होती.
T20 World Cup 2026 : अली खानसमोर अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'सह आली 'गंभीर' वेळ
'ती' पहिल्यासारखी नव्हती, पण...
"आजची वानखेडेची खेळपट्टी ही नेहमीसारखी नव्हती. सकाळी उठल्यावरच आम्हाला जाणवलं की, ऊन फारसं नव्हतं. क्युरेटर आणि ग्राउंड्समननी उत्तम खेळपट्टी तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण काही गोष्टी त्यांच्या हातात नसतात. पुरेसं ऊन नसल्यानं विकेट रोलिंग आणि पाणी देणं नीट झालं नसेल. कदाचित त्याचा परिणाम झाला असेल. पण सगळं काही कारणांवर ढकलून देता येणार नाही. आम्ही फलंदाजीत आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो." अशा शब्दांत खेळपट्टी पहिल्यासारखी नव्हती, पण आम्ही फलंदाजीत कमी पडलो हे सूर्यकुमार यादवनं मान्य केले.
काय चुकलं, या चुका कशा सुधारता आल्या असत्या? यावर कर्णधारानं असं दिलं उत्तर
या विजयानंतर खूप काही शिकायला मिळतं. आज आम्हाला कळलं की, आम्ही थोडं अधिक चांगलं किंवा थोडं जबाबदारीनं फलंदाजी करू शकलो असतो. एका-दोन फलंदाजांवर शेवटपर्यंत खेळण्याची जबाबदारी न टाकता, छोट्या-छोट्या भागीदारीसह १६० धावांपर्यंत सहज पोहोचता आले असते. पण ते ठीक आहे. यावर आम्ही निवांत बसून विचार करू. पुढच्या सामन्याआधी आमच्याकडे पाच दिवसांचा वेळ आहे. आम्ही अधिक मजबूतीनं मैदानात उतरू.
बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीची अपडेट्सही दिली
वॉशी दिल्लीमध्ये आमच्यात सामील होत आहे. तो पूर्णपणे ठिक आहे. सगळं व्यवस्थित आहे. अभिषेक प्रमाणेच बुमराहला वातवरणामुळे ताप आला होता. पण चिंता करण्याची काही गरज नाही, असे सांगत त्याने पुढच्या सामन्यापर्यंत बुमराही फिट होईल, असे म्हटले आहे.