राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:04 IST2026-01-17T14:03:12+5:302026-01-17T14:04:31+5:30
Amravati Municipal Corporation Results: "अमरावती महापालिका निकाल २०२६: भाजपला धक्का! यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका - 'युवा स्वाभिमानीने भाजपचा गेम केला'. अमरावतीत भाजपचे लंगडं सरकार येणार का? वाचा सविस्तर."

राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले...
अमरावती महानगरपालिकेच्या ८७ जागांचे निकाल जाहीर झाले असून, येथील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीत सहभागी असलेल्या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीने भाजपला धोबीपछाड दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "अमरावतीत भाजपने विजयाचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची अवस्था बिकट झाली आहे. युवा स्वाभिमानीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाजपचा गेम केला आहे. आता भाजपला सत्तेसाठी इतरांच्या कुबड्यांची गरज पडणार असून, शहरात एक 'लंगडं' सरकार सत्तेवर बसताना आम्हाला दिसत आहे."
१९ सभा घेऊनही जनतेने नाकारले?
पालकमंत्र्यांनी आणि भाजपच्या सर्व आमदारांनी अमरावतीत पूर्ण ताकद पणाला लावली होती. "पालकमंत्र्यांच्या तब्बल १९ सभा झाल्या, पण जनतेने त्यांना कौल दिला नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती आणि अमरावतीच्या जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला आहे," असेही ठाकूर यांनी ठामपणे मांडले.
अमरावतीत काय झाले...
गत निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवणाऱ्या युवा स्वाभिमानने यंदा १५ जागांवर विजय खेचून आणला आहे. आमदार रवी राणांची जादू चालली, हे निकालाने स्पष्ट झाले. काही अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, व अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या जाहीर सभासुद्धा फार करिष्मा करू शकल्या नाहीत. राष्ट्रवादी (अजित पवार) ने थेट ८५ जागांवर उमेदवार उभे केले होते; पण ११ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने २५ जागांवर विजय मिळवला असला तरी गतवेळीपेक्षा २० जागांवर पीछेहाट झाली आहे.