काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने भरती आयोगाला टाळे ठोकले, हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 10:00 IST2024-05-25T09:59:29+5:302024-05-25T10:00:16+5:30

तरुणांना एक लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही 

Congress's blocks recruitment commission, criticizes PM Modi in Himachal | काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने भरती आयोगाला टाळे ठोकले, हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका

काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने भरती आयोगाला टाळे ठोकले, हिमाचलमध्ये पंतप्रधान मोदी यांची टीका

शिमला : काँग्रेसनेहिमाचल प्रदेशातील तरुणांना एक लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोप करीत काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने राज्य कर्मचारी निवड आयोगालाच कुलूप ठोकले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केली. 

भाजपचे सिमला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश कश्यप यांच्यासाठी सिरमौर जिल्ह्यातील नाहान येथे प्रचारसभेला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की, एक लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसच्या ‘टाळेबाज सरकार’ने हिमाचल प्रदेश कर्मचारी निवड आयोगालाच (एचपीएसएससी) टाळे ठोकले. 

हिमाचल ही राम मंदिराची संकल्प भूमी
पंतप्रधानांनी हिमाचलला अयोध्येत राममंदिराच्या बांधकामासाठी ‘संकल्प भूमी’ म्हटले. पालमपूरमध्ये भाजपने मंदिर बांधण्यासाठी घेतलेल्या प्रतिज्ञेचा संदर्भही त्यांनी दिला. भाजपच्या कार्यकारिणीने १९८९ मध्ये मंदिराच्या उभारणीचा ठराव मंजूर केला होता. 

कंगना तरुण, मुलींच्या आकांक्षांच्या प्रतिनिधी
मंडी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कंगना राणावत तरुणांच्या आणि आमच्या मुलींच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात, असेही मोदी म्हणाले. कंगना यांच्याविरुद्ध अपमानास्पद विधाने करून काँग्रेस नेत्यांनी मंडी आणि हिमाचलचा अपमान केला, असा आरोप मोदींनी केला.
 

Web Title: Congress's blocks recruitment commission, criticizes PM Modi in Himachal