Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पश्चिममध्ये अस्तित्वाची लढाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:44 PM2019-10-17T23:44:45+5:302019-10-17T23:45:16+5:30

नागपूर पश्चिममध्ये भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत.

Maharashtra Assembly Election 2019: Ground Report: The Battle of Existence in Nagpur West | Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पश्चिममध्ये अस्तित्वाची लढाई 

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पश्चिममध्ये अस्तित्वाची लढाई 

Next
ठळक मुद्दे भाजपला बंडखोरीचे ग्रहण : वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारच नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा झेंडा रोवलेला पश्चिम नागपूरचा गड राखण्यासाठी यावेळी भाजपला खूप परिश्रम घ्यावे लागत आहे. भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत. गेली विधानसभा व लोकसभेत भाजपला आघाडी मिळाली असली तरी दोन टर्म पूर्ण केलेल्या उमेदवारालाच पुन्हा संधी दिल्याने पक्षांतर्गतही नाराजीचे सूर आहेत. हिंदीभाषिक मतांना खिंडार पाडणारी बंडखोरीही झाली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे आजवर एकतर्फी होत असलेला सामना आता काँग्रेसने ‘बराबरी की टक्कर’वर आणून पोहचवला आहे.
२०१४ मध्ये भाजपचे सुधाकर देशमुख २६,४०२ मतांनी विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हे मताधिक्य कायम राहिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे २७,२५२ मतांची आघाडी मिळाली. भाजपचे पक्ष संघटन येथे बळकट आहे; शिवाय देशमुख बऱ्याच पूर्वीपासून कामाला लागले आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाली. महापौर नंदा जिचकार, नगरसेवक भूषण शिंगणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक रमेश चोपडे यांचीही नावे रेसमध्ये होती. यावेळी उमेदवार बदलेल, असा दावा पक्षांतर्गत केला जात असताना प्रत्यक्षात सुधाकर देशमुख यांनाच तिकीट मिळाले. देशमुख यांच्यासाठी भाजपची दिल्ली व राज्यातील नेत्यांची टीम उतरली असली तरी, देशमुख यांना गेल्या १० वर्षांतील ‘अ‍ॅन्टी इनकम्बसी’चा सामना करावा लागत असल्याचे लोकमत चमूच्या पाहणीत दिसून आले.
गेल्यावेळीच्या पराभवापासून धडा घेत विकास ठाकरे यांनी यावेळी सावध रणनीती आखली. ते भाजपमध्ये जाणार या अफवेमुळे भाजप कार्यकर्ते उमेदवारी घोषित होईपर्यंत संभ्रमात होते. या काळात भाजप शांत राहिली व प्रचारात मागे पडली. दुसरीकडे ठाकरेंच्या नावाचीच चर्चा झाली. महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट कटलेल्या, पक्षात पद न मिळालेल्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एकसंघ करण्यात यावेळी ठाकरे यांना यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली ताकद लावली आहे. यावेळी विकास ठाकरे यांच्याबाबत मतदारांमध्ये काहीशी सहानुभूती पाहायला मिळत आहे.
पश्चिम नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत तांत्रिक कारणामुळे बाद झाला. याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होईल, असे दिसते. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ४,३५९ मते घेतली होती.
बसपाने येथे अफजल फारुक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात हत्तीची चाल मंदावली. फक्त ४,५९६ मते मिळाली. यावेळीही बसपाचा फारसा प्रभाव पडेल, असे दिसत नाही. येथे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली नाही. मात्र, भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. या भागातील हिंदीभाषिकांचे भाजपला झुकते माप असायचे. मात्र, हिंदीभाषिक चेहरा असलेले मनोज सिंह हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून, ते हिंदीभाषिक मतांना ते खिंडार पाडताना दिसत आहेत. उच्च शिक्षित असलेले राजीव रंजन सिंह हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्यामुळे त्यांचा अपघात झाला असता त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. यामुळे ते चर्चेत आले होते. तसे पाहिले तर देशमुख व ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या पॉलिटिकल करिअरमध्ये शेवटची निवडणूक लढत आहे. पश्चिममध्ये कुणाचा अस्त होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

एकूण उमेदवार - १२
एकूण मतदार : ३,६२,२७४

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Ground Report: The Battle of Existence in Nagpur West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.