अकबर, बाबर यांचीच चर्चा का?, छत्रपती शिवाजी महाराज, राजपूत राजांवर चर्चा हवी - सुनील शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:38 IST2026-02-05T14:37:14+5:302026-02-05T14:38:00+5:30
आपण औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याविषयीच का बोलतो? आपला इतिहास, आपल्या संस्कृतीची माहिती असायला हवी असं सुनील शेट्टीने म्हटलं.

अकबर, बाबर यांचीच चर्चा का?, छत्रपती शिवाजी महाराज, राजपूत राजांवर चर्चा हवी - सुनील शेट्टी
मुंबई - २०२५ मध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याने केसरी वीर नावाच्या सिनेमात अभिनय केला होता. हा सिनेमा गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर अनेकदा झालेल्या विध्वंसावर आधारित होता. परंतु बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रिलीज होता फार काही कमाल करू शकला नाही. हा सिनेमा का चालला नाही याबाबत एका मुलाखतीत सुनील शेट्टी याने कारण सांगितले आहे. त्यावेळी त्याने अकबर, बाबरसारख्या ऐतिहासिक व्यक्तींवर बनलेल्या सिनेमांचाही उल्लेख केला आहे. राजपूत राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरही चर्चा व्हायला हव्यात पण त्या होत नाही असं सुनील शेट्टी याने म्हटलं.
एका मुलाखतीत सुनील शेट्टी याने केसरी वीर सिनेमा आणि त्यातील अभियनापूर्वी सोमनाथ मंदिराच्या इतिहासावर केलेल्या रिसर्चवर म्हणाला की, आम्ही सिनेमा बनवण्यापूर्वी खूप रिसर्च केला परंतु दुर्दैवाने तो सिनेमा चालला नाही. डिस्ट्रीब्यूशन हा एक मोठा खेळ आहे. आम्हाला थिएटर मिळाले नाहीत. निर्मात्यांनाही भरपूर नुकसान झाले कारण ते स्वत:ही लोकांसोबत डिस्ट्रीब्यूशनचे काम करत होते. एक चांगला सिनेमा बर्बाद झाला अशी खंत त्याने व्यक्त केली.
तसेच आपण औरंगजेब, अकबर, बाबर, बिरबल यांच्याविषयीच का बोलतो? आपला इतिहास, आपल्या संस्कृतीची माहिती असायला हवी. हे वेद, राजपूत राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर सर्वांची माहिती असायला हवी. प्रत्येक राज्याच्या प्रत्येक हिरोबाबत चर्चा व्हायला हवी असंही अभिनेता सुनील शेट्टी याने म्हटलं आहे.
अक्षय कुमारने शालेय अभ्यासक्रमावर व्यक्त केली होती नाराजी
दरम्यान, याआधी पृथ्वीराज चौहान सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिनेता अक्षय कुमार यानेही भारतीय इतिहास अभ्यासात आपल्या संस्कृतीवर लक्ष द्यायला हवे असं म्हटलं होते. दुर्दैवाने, आपल्या इतिहास अभ्यासात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्यावर केवळ २-३ ओळी आहेत परंतु आक्रमणकर्त्यांबद्दल खूप काही लिहून ठेवले आहे. आपली संस्कृती आणि महाराजांविषयी कदाचितच लिहिले जाते. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी इतके काही आहे परंतु आपल्याला त्याविषयी काही माहिती नाही हे कळल्यावर मला आश्चर्य वाटले असंही अक्षय कुमारने सांगितले होते.