प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली? सुरभीसोबत मुलाखत देणार नाही म्हणणाऱ्या तेजस्वी प्रकाशवर होतेय टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:30 IST2026-02-27T11:29:27+5:302026-02-27T11:30:08+5:30
तेजस्वी प्रकाशच्या वर्तनावर सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त होत आहे.

प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली? सुरभीसोबत मुलाखत देणार नाही म्हणणाऱ्या तेजस्वी प्रकाशवर होतेय टीका
मराठी तसंच हिंदीमध्येही सक्रीय असलेली आणि बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या सौंदर्य, क्युटनेसवर चाहते फिदा आहेत. तिची 'सायको सैयां' ही वेबसीरिज येणार आहे. सीरिजमध्ये तिच्यासोबत टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना देखील आहे. काल सीरिजनिमित्त कलाकारांच्या मुलाखती होणार होत्या. मात्र या मुलाखतींना सुरभी चंदना एकटीच आली होती. सुरभीसोबत मुलाखत देणार नाही, माझी वेगळी मुलाखत घ्या असं तेजस्वीचं म्हणणं होतं. इतकंच नाही तर तेजस्वी तब्बल २ तास उशिरा आली. यावरुन दोघींमधील कॅटफाइटची इंडस्ट्रीत चर्चा होत आहे.
'स्क्रीन'च्या अहवालानुसार, तेजस्वी प्रकाश, सुरभि चंदना आणि अनुद सिंह ढाका यांच्या मुलाखती आधीच ठरल्या होत्या. मात्र, तेजस्वी दोन तास उशिरा पोहोचली आणि तिने सुरभीसोबत प्रमोशनल प्लॅटफॉर्म शेअर करण्यास नकार दिला. सुरुवातीला तेजस्वीच्या कपड्यांमध्ये काही अडचण असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला, पण तासनतास वाट पाहिल्यानंतर तेजस्वीने सुरभी असेपर्यंत तिथे येण्यासच नकार दिल्याचे समोर आले.
या गोंधळात एमएक्स प्लेयरच्या टीमची मोठी तारांबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच सर्व कार्यक्रमाची कल्पना देऊनही तेजस्वीने शेवटच्या क्षणी घेतलेल्या या भूमिकेमुळे टीम हतबल झाली होती. तेजस्वीच्या पब्लिसिस्टने स्पष्ट केले की, जोपर्यंत सुरभि चंदना तिथून जात नाही किंवा मुलाखतीचा भाग असणार नाही, तोपर्यंत तेजस्वी येणार नाही. अखेर बरेच प्रयत्न केल्यानंतर तेजस्वी आली पण ती थेट मेकअप रूममध्ये निघून गेली.
दुसरीकडे या संपूर्ण प्रकारामुळे सुरभी चंदना अत्यंत नाराज आणि अस्वस्थ झाली होती. तिला वेगळ्या मुलाखतीसाठी बोलावले गेले खरे, पण अपमानित झाल्यासारखे वाटल्याने ती रागात बाहेर पडली. तिने अनुद सिंह ढाकासोबत काही वेळ मुलाखत दिली, मात्र पुढच्या फेरीची तयारी सुरू असताना तिला आपले अश्रू अनावर झाले. सर्वांसमोर अशा प्रकारे डावलले गेल्यामुळे सुरभी तिथून रडत निघून गेली.
सुरभी निघून गेल्यावर तेजस्वी प्रकाश बाहेर आली आणि तिने ठरलेल्या मुलाखती पूर्ण केल्या. या दोन अभिनेत्रींमध्ये नक्की काय बिनसले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर तेजस्वीच्या वागणुकीवर टीका होत आहे, तर सुरभिबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक कामात अशा वैयक्तिक मतभेदांमुळे उद्भवलेला हा ड्रामा सध्या मनोरंजन विश्वात चांगलाच गाजत आहे.