लागिरं झालं जी या मालिकेचा असा असणार शेवट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 19:54 IST2019-06-17T19:48:45+5:302019-06-17T19:54:21+5:30
लागिरं झालं जी ही मालिका संपणार हे प्रेक्षकांना कळल्यापासून या मालिकेचा शेवट काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

लागिरं झालं जी या मालिकेचा असा असणार शेवट?
''लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी'' असे म्हणत शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमकथेने थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. अज्या आणि शीतलीची प्रेमकथेवर आधारित असलेली ‘लागिरं झालं जी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याची जागा Mrs. मुख्यमंत्री ही मालिका घेणार आहे.
शिवानी बावकर आणि नितेश चव्हाण यांच्या जोडीने दीड वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचं विशेष महत्त्व आहे. अजिंक्यचा मित्र राहुल्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी, भैय्यासाहेब या भूमिका रसिकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. त्यामुळे ही मालिका निरोप घेणार हे कळल्यापासून या मालिकेच्या फॅन्सना नक्कीच वाईट वाटत आहे.
लागिरं झालं जी ही मालिका संपणार हे प्रेक्षकांना कळल्यापासून या मालिकेचा शेवट काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेचा शेवट काय असणार याविषयी आयबीएन लोकमतने वृत्त दिले आहे. त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, मालिकेत सध्या शितल गरोदर असून तिच्या डोहाळे जेवणाच्या दिवशीच अजिंक्य बेपत्ता असल्याचा आर्मीकडून फोन येणार आहे.
अजिंक्य कुठेच सापडत नसल्याने सगळ्यांना टेन्शन येणार आहे. अजिंक्य जगात नसल्याचे सगळ्यांना वाटत असले तरी हे सत्य स्वीकारायला शीतल तयार नाहीये. या दरम्यान शितलला मुलगा होणार असून अजिंक्याला काहीही करून शोधायचे असे ती ठरवणार आहे. ती लहान मूल सांभाळत शीतल आर्मीचे ट्रेनिंग पूर्ण करणार आहे. शितल आर्मीत जॉईन झाल्यावर अजिंक्य पाकिस्तानात कैदी असल्याचे सगळ्यांना कळणार आहे. त्याला भारत सरकार परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून काही महिन्यांनी तो परत येणार आहे आणि शीतल वर्दीत त्याचे स्वागत करणार आहे.