वडिलांना व्यवसायात तोटा अन् एका क्षणात सगळं गमावलं; 'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादाच्या कुटुंबासोबत काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:11 IST2026-02-16T16:01:11+5:302026-02-16T16:11:57+5:30
"११ गाड्या, राहतं घर सगळं विकावं लागलं....",तुझ्यात जीव रंगला मधील राणादाने सांगितला आयुष्यातला पडता काळ

वडिलांना व्यवसायात तोटा अन् एका क्षणात सगळं गमावलं; 'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादाच्या कुटुंबासोबत काय घडलेलं?
Hardeek Joshi :'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात 'राणादा' म्हणून पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी (Hardeek Joshi).या मालिकेने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. मालिकेत त्याने साकारलेलं राणादा नावाचं पात्र प्रेक्षकांच्या मनावर कायमच कोरलं गेलं.दरम्यान, पडद्यावर नेहमी हसतमुख आणि कणखर दिसणाऱ्या हार्दिकचा भूतकाळ मात्र प्रचंड संघर्षाचा होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने आपल्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे.
वडिलांच्या व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे अवघ्या ४८ तासांत त्यांना राहतं घर देखील विकावं लागलं होतं.नियतीचा खेळ काही वेगळाच होता. या सुखाला कोणाची तरी नजर लागली आणि परिस्थिती एका झटक्यात बदलली.सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये बोलताना हार्दिक म्हणाला, "माझ्या वडिलांचा लेदर स्क्रॅपचा बिझनेस होता. त्यावेळी आमची परिस्थिती खूप चांगली होती. घरात एकूण ११ गाड्या होत्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण दहावीच्या परीक्षेला जाताना मी दहाही दिवस वेगवेगळ्या गाड्यांतून गेलो होतो."
यापुढे हार्दिकने सांगितलं, "वडिलांना फॉरेन ट्रेडच्या व्यवसायात मोठा तोटा झाला. परिस्थिती अशी ओढवली की, कर्जाची परतफेड करण्यासाठी आम्हाला अवघ्या ४८ तासांत मुंबईतील आमचं राहतं घर आणि त्या ११ गाड्या विकाव्या लागल्या. एका क्षणात सगळंच गेलं."
बोईसर ते दादर लोकलचा प्रवास
जेव्हा मुंबईतील घर गेलं, तेव्हा हार्दिकचं कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलं होतं. त्या कठीण काळाबद्दल सांगताना तो म्हणाला, "घर गेल्यानंतर आम्ही बोईसरला राहायला गेलो. तिथून मी रोज बोईसर ते दादर असा प्रवास करायचो. त्यानंतर आम्ही 'अँटॉप हिल'ला भाड्याने घर घेतलं. पण त्याचं भाडे जास्त असल्याने तिथूनही आम्ही शिफ्ट झालो.मग ठाणे आणि पुढे मुलुंड, असा आमचा भाड्याच्या घरातला प्रवास सुरू झाला."
आईचे संस्कार कामी आले...
मग अभिनेता म्हणाला, "आमच्याकडे ११ गाड्या होत्या, घरी श्रीमंती होती, तरीही शाळेत जाताना आई मला खर्चासाठी फक्त ३ रुपयेच द्यायची. त्यावेळी मला त्याचा राग यायचा, पण आज त्या संस्कारांचे महत्त्व कळते. त्या ३ रुपयांमुळेच मला कमी गरजांमध्ये जगण्याची सवय लागली. त्यामुळेच जेव्हा सर्वकाही गेलं, तेव्हा मला जुळवून घेणं कठीण गेलं नाही," असं हार्दिकने भावुक होत सांगितलं.