'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:18 IST2024-12-05T14:17:44+5:302024-12-05T14:18:26+5:30
अभिनेत्रीने मानले निर्मात्यांचे, चॅनलचे आभार, म्हणाल्या, "कोणतेही मालिकावाले..."

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजींनी सांगितला सेटवरचा किस्सा, म्हणाल्या, "अक्षरश: मृत्यूच्या दारातून..."
'स्टार प्रवाह'वरील 'ठरलं तर मग' मालिका चांगलीच गाजत आहे. मालिकेतील सर्वच कलाकार लोकप्रिय आहेत. अर्जुन-सायलीची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना विशेष आवडते. तसंच पूर्णा आजी चं कॅरेक्टर तर प्रेक्षकांच्या अगदी लाडकं आहे. अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांनी ही भूमिका साकारली आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांचं एकमेकांशी खास बाँडिंग आहे. याचंच उदाहरण नुकतंच पूर्णा आजींनी एका मुलाखतीत दिलं.
'द क्राफ्ट'ला दिलेल्या मुलाखतीत ज्योती चांदेकर म्हणाल्या, "मंगळागौरीचा सेगमेंट चालू होता. मी अचानक बेशुद्ध पडले. माझं सोडियम कमी झालं होतं. सगळे माझ्यासाठी धावत आले. सगळ्यांनी मला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. पुन्हा त्याच जोशातून मी सेटवर परत आले. आमच्यात खूप छान बाँडिंग आहे. कोणीही आजारी पडलं की त्याने लवकर बरं व्हावं म्हणून सगळे प्रयत्न करत असतात. "
त्या पुढे म्हणाल्या, "दुसऱ्या वेळी पुन्हा असंच झालं तेव्हा तर मी अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आले. कोणीही मालिकावाले २ महिने एका कलाकारासाठी थांबत नाहीत. पण ही सगळी मंडळी माझ्यासाठी थांबली होती. २ महिने मी काम करत नव्हते. पण सर्वांनी इतकं ओढून छान नेलं की पूर्णा आजी आहे..आजी आहे असंच दाखवलं. कोणीही माझी कमतरता जाणवू दिली नाही."
यालाच जोडून अभिनेत्री आणि लेखिका शिल्पा नवलकर म्हणाल्या, "सतीश राजवाडे यांनी मीटिंगमध्ये चर्चा झाली की पूर्णा आजी २ महिने नसणार तर या भूमिकेचं काय करुया? रिप्लेस करायचं की काय. तेव्हा सतीश राजवाडे एकदाच म्हणाले की 'नाही, आजारपणामुळे अजिबात रिप्लेस करायचं नाही. आपण थांबूया."