"त्या क्षणी नोकरी सोडली...",'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:35 IST2025-06-14T14:33:14+5:302025-06-14T14:35:49+5:30
'सुख म्हणजे नक्की काय असतं'फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली-"एखादी मुलगी..."

"त्या क्षणी नोकरी सोडली...",'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, काय घडलं?
Madhavi Nimkar: 'सुख म्हणजे नक्की काय असतं','स्वप्नांच्या पलिकडले' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून अभिनेत्री माधवी निमकर घराघरात पोहोचली. या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या खलनायिकी भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. माधवी निमकर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीही शेअर करते. त्यात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला आलेल्या वाईट अनुभवांवर भाष्य केलं आहे.
नुकतीच माधवी निमकरने अभिनेत्री कांचन अधिकारी यांच्या बातों बातों में या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यादरम्यान तिने अभिनय प्रवासाबद्दल सांगितलं. त्यावेळी माधवी म्हणाली,"माझी सख्खी मावस बहिण सोनाली खरे ही खूप वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. तिच्याकडे बघून मला असं वाटायचं ताई हे करतेय तर मला देखील करायचं आहे. जे प्रत्येक लहान भाऊ, बहिणीला वाटत असतं. तसं तिच्याकडे बघून मला वाटायचं. ताईने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवास सुरु केला तेव्हा ती डोंबिवलीला राहायची मी खोपोलीत राहत होते. त्यावेळी तिच्यासोबत सुट्टीच्या दरम्यान मी तिची शूटिंग बघायला जायचे. मग तिची ती धावपळ आणि संघर्ष हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला आहे. सगळं चालू असताना एक दिवस आई मला म्हणाली, तुझी एवढीच इच्छा आहेत तर तू सुरुवात कर. आम्हाला तुला आर्थिक मदत येणार नाही. पण,आम्ही तुला मानसिक पाठबळ देऊ. मग म्हटलं सुरुवात जर करायची असं ठरवलं तरी राहायचं कुठे असा प्रश्न होता. मग माझी सख्खी मावस बहीण अलका साठ्ये ती गोरेगाव स्टेशनला राहायची. त्यानंतर मी तिच्याकडे राहायला गेले.तिथून सुरुवात केली.पण, तेव्हा स्ट्रगलसाठी सुद्धा पैसे नव्हते. तेव्हा मग माझ्या भाचीने मला समोरच्या बिल्डिंगमध्ये कामाला लावलं. ऑफिसचं काम होतं, कोण येतंय-जातंय त्याची पावती तयार करायची,असं छोटंसं काम होतं."
पुढे अभिनेत्रीने सांगितलं,"तिथे मला एक वाईट अनुभव आला. मी तिथे फक्त दोन महिनेच काम केलं. जेव्हा आपण म्हणतो, आपल्याला कळतं की, एखादी मुलगी गरिब घरातून आलेय,साधी आहे असं तिथल्या बॉसला वाटलं असावं. त्याचं एक अचानक वेगळं रुप माझ्या समोर आलं. त्याच क्षणी मी नोकरी सोडली. तो हिंदी भाषिक होता. सुरुवातीला त्याच्या बोलण्यातून असं यायचं की, अरे,तुझे वडील आता म्हातारे होत चालले आहेत. तुझ्या वडिलांसाठी मी घर घेऊन देईन. तुझ्या वडिलांनी मी सांभाळेन. त्यांनी मुंबईत शिफ्ट करेन."
काय घडलेलं?
या घटनेबद्दल सांगताना माधवी म्हणाली, "सुरुवातीला मला या गोष्टी नाही कळायच्या. कारण, अतिशय ग्रामीण भागातून मुंबईत आले होते. मी घाबरायचे, विसरभोळी होते. खंबीर नव्हते. शिवाय मी खोपोली ते कर्जत याच्याशिवाय मला काहीच माहित नव्हतं. पण, जेव्हा मला त्या माणसाविषयी कळलं तेव्हा मी खूप घाबरले.त्या क्षणी ठरवलं की मला नोकरी नाही करायची." असा खुलासा अभिनेत्रीने केला.