खरंच Z+ सिक्युरिटीमध्ये स्मृती इराणी करत आहेत 'क्योंकि सास भी कभी...'चं शुटिंग? स्वत:च केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:10 IST2025-10-12T12:08:21+5:302025-10-12T12:10:03+5:30
'क्योंकि सास भी कभी...'च्या सेटवर स्मृती इराणींना Z+ सिक्युरिटी? जाणून घ्या...

खरंच Z+ सिक्युरिटीमध्ये स्मृती इराणी करत आहेत 'क्योंकि सास भी कभी...'चं शुटिंग? स्वत:च केला खुलासा
Smriti Irani Reacts To Rumours Of Z+ Security: 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' या लोकप्रिय मालिकेमुळे अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती ईराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. स्मृती ईराणी यांनी टीव्हीवर कमबॅक करताच सगळीकडे त्यांची चर्चा पाहायला मिळतेय. गेल्या काही वर्षांपासून स्मृती या राजकारणात सक्रिय होत्या आणि त्यांनी कलाक्षेत्रापासून थोडं अंतर ठेवलेलं होतं. पण, 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' या मालिकेतून बऱ्याच वर्षांनी त्यांनी टिव्हीवर पुनरागमन केलं. दुसऱ्या सीझनसाठी त्यांना सेटवर झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्याचं म्हटलं गेलं. यावर आता खुद्द स्मृती ईराणी यांनी खुलासा केलाय.
स्मृती यांनी नुकतीच 'मॅशेबल इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी झेड प्लस सुरक्षेत शुटिंग करत असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, "जेव्हा मी झेड+ सुरक्षेत शूटिंग करणार आहे अशी बातमी पसरली, तेव्हा मला खरोखर आश्चर्य वाटले आणि मी खूप हसले".
दरम्यान, 'क्यूंकी सास भी कभी बहू थी २' चा पहिला भाग प्रसारित होण्यापूर्वी, मे २०२५ मध्ये आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, स्मृती इराणींना सेटवर 'झेड-प्लस' सुरक्षा पुरवण्यात आली आहे आणि सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग म्हणून अमर उपाध्याय, एकता कपूर आणि स्मृती इराणी वगळता इतरांचे मोबाईल फोन टॅप केले जातील. या सर्व बातम्या खोट्या आणि अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले आहे.
२००० साली 'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिका सुरू झाली होती. ८ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर २००८ मध्ये मालिकेने निरोप घेतला. आता नव्या दमात पुन्हा मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तुलसी विराणी ही अभिनेत्रीने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांना आठवते आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
स्मृती इराणी यांची राजकीय कारकीर्द
स्मृती इराणी यांनी २००३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्या २०१४ ते २०१६ पर्यंत केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री होत्या. नंतर त्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री झाल्या (२०१६ ते २०२१). २०१७ ते २०१८ पर्यंत त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही काम केले आणि २०१९ मध्ये त्यांची केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्या २०२४ पर्यंत महिला आणि बाल विकास मंत्री आणि २०२२ ते २०२४ पर्यंत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री देखील राहिल्या.