"काय माझं भाग्य…" संकर्षण कऱ्हाडेने घेतले साई बाबांचे दर्शन; अनुभव सांगत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:43 IST2026-03-26T11:27:58+5:302026-03-26T14:43:28+5:30
संकर्षणने नुकतेच शिर्डीला जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले, तसेच त्याचा अनुभव त्याने लिहिला.

"काय माझं भाग्य…" संकर्षण कऱ्हाडेने घेतले साई बाबांचे दर्शन; अनुभव सांगत म्हणाला...
मराठी कलाविश्वामध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच संकर्षण एक संवेदनशील लेखक आणि कवी म्हणूनही ओळखला जातो. संकर्षणने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच संकर्षण सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. आता संकर्षणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
संकर्षणने शिर्डीतील फोटो शेअर करत साई दर्शनाचा अनुभव लिहिला. तो म्हणाला, "काय माझं भाग्य... छ. संभाजीनगरचा प्रयोग करुन नाशिककडे जाताना अचानक वाटलं साईबाबांचं दर्शन घ्यावं. समृद्धी महामार्गावरून गाडी वळवली थेट शिर्डीकडे. मी पहिल्यांदाच साई बाबांचं दर्शन घेतलं. फारंच छान वाटलं. पायी प्रवास करुन आलेले, महाराष्ट्राच्या बाहेरून वेगवेगळ्या प्रांतातून आलेले, रांगेत ऊभे असलेले साईभक्तं… मंदिराचा स्वच्छ परिसर... हात जोडून जय साईराम म्हणणारे सगळे कर्मचारी आणि डोळ्यांतल्या ममत्वं भावनेने भक्तांची वाट पहाणारे साईबाबा. खूपच छान वाटलं, जय साईराम", असं त्यानं लिहलं. संकर्षणचा व्हिडीओ साई संस्थानकडूनही शेअर करण्यात आला आहे.
संकर्षण हा सध्या 'कुटुंब किर्रतन' आणि 'आम्ही सारे खवय्ये' याचे प्रयोग महाराष्ट्रासह जगभरात घेत आहे. संकर्षण कऱ्हाडे हा मुळचा परभणीचा आहे. 'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' हा संकर्षणचा डायलॉग फेमस आहे. २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या 'आभास' हा या मालिकेच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. संकर्षणने 'मला सासू हवी', 'खुलता कळी खुलेना' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत काम केले आहे.