"मित्रांनी आपल्या विरोधातच कारस्थान करावं तर ती मैत्री नाही", सागर कारंडे अखेर व्यक्त झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:19 IST2026-01-25T12:17:15+5:302026-01-25T12:19:48+5:30
तुमचा वापर जर टिश्यू पेपरसारखा होत असेल तर ती कसली मैत्री?", सागर कारंडे कोणाबद्दल बोलला वाचा

"मित्रांनी आपल्या विरोधातच कारस्थान करावं तर ती मैत्री नाही", सागर कारंडे अखेर व्यक्त झाला
'चला हवा येऊ द्या'मुळे घराघरात पोहोचलेला सागर कारंडे सध्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात दिसत आहे. आपल्या विनोदांनी, हवा येऊ द्या मधील पत्रांनी त्याने प्रेक्षकांना कधी हसवलं तर कधी रडवलं. चला हवा येऊ द्या शो १० वर्षांनी बंद झाला. नंतर सागर नाटकांमध्ये काम करत होता. मात्र एकाएकी तो इंडस्ट्रीतील प्रसिद्धीझोतापासून दूर झाला. मधल्या काळात त्याची आर्थिक फसवणूक झाली अशाही बातम्या आल्या होत्या. त्याची तब्येत बरी नसल्याने नाटकाचे शो रद्द झाले अशीही चर्चा झाली होती. आता बिग बॉस निमित्ताने तो पुन्हा लाईमलाइटमध्ये आला आहे. नुकतंच त्याने इंडस्ट्रीतील मित्रांनीच कशी कट कारस्थानं केली याचा अनुभव सांगितला.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडे म्हणाला, "मला स्पष्ट बोलण्याचे नेहमी तोटेच झालेत. मी समोरच्याला एखादी गोष्ट सांगितली की त्याला राग यायचा मग तो कोणीही असेल दिग्दर्शक, लेखक, निर्माता कोणीही...त्यामुळे मला वाटायचं आपण सांगणंच चुकीचं आहे. पण मला न सांगणंही खटकत होतं. व्हायचं ते होऊदे पण माझ्या मनात जे चालुए ते मी सांगितलंच पाहिजे असं मला वाटतं. यामुळे माझी खूप नाती तुटली. मित्र तुटले...खरं तर त्यांना मित्र नाही म्हणता येणार. मी त्यांना मित्र समजत होतो पण तसं नसतं. गेल्या काही वर्षात ते मला जाणवलं. आपल्याच मित्राने आपल्याबद्दल काही कारस्थान करावं तर ती मैत्री नाही ना..तुमचा वापर जर टिश्यू पेपरसारखा होत असेल तर ती कसली मैत्री?"
तो पुढे म्हणाला, "नंतर नंतर मी बोलायचंच सोडलं. समोरच्याला वाईट वाटेल म्हणून बोलत नव्हतो. पण त्याचा असाही समज झाला की अरे हा बोलतच नाही. याच्याबरोबर राजकारण करु शकतो, याला जाळ्यात अडकवू शकतो असं म्हणत लोकांनी मला गृहित धरलं. असे अनेक अनुभव मला खूप लवकर आले. पण बरंच झालं यामुळे मला माणसं समजली. मी आता दोन भेटीत माणसांना ओळखतो. आपण जसे आहोत तसे एकमेकांना स्वीकारलं पाहिजे तर ती मैत्री. तुम्ही ओरडू शकता, सल्ले देऊ शकतो पण त्याने बदलावं असा अट्टाहास नको. माझे या इंडस्ट्रीत आता मित्र नाहीत. तीन चार असतील...बाकी बाहेर बरेच मित्र आहेत. पण इंडस्ट्रीत नाही."