'कोवळ्या वयात मुलांवर भाषांचे ओझे कशाला?'; हिंदी भाषा सक्तीविरुद्ध 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी उठवला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 09:51 IST2025-06-22T09:51:16+5:302025-06-22T09:51:45+5:30
शासनाने हिंदी सक्तीचा जो निर्णय काढला आहे, त्याविरोधात सचिन गोस्वामींनी पोस्ट लिहून सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. काय म्हणाले गोस्वामी?

'कोवळ्या वयात मुलांवर भाषांचे ओझे कशाला?'; हिंदी भाषा सक्तीविरुद्ध 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींनी उठवला आवाज
महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी यांनी शासनाच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मुद्देसुदपणे त्यांचं म्हणणं मांडलं आहे. सचिन लिहितात, शासनाच्या पहिली पासून हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य (जरी तिची अनिवार्यता काढून कुठलीही भाषा,पण २० विद्यार्थी जमले तरच असा विचित्र पर्याय देऊन शब्दछल केला असल्याने)करण्याला विरोध आहे..हिंदी भाषा शिकण्याला नाही."
"मुलं थोडी मोठी झाली की ५ वी नंतर शिकवा की हिंदी..आमचा विरोध प्राथमिक शिक्षणात समावेशाला आहे..सरसकट हिंदी भाषेला नाही. कोवळ्या वयात मुलांना मराठी लिपी,व्याकरण याचा अदमास यायला पुरेसा वेळ मिळावा. मातृभाषेचा पाया घट्ट व्हावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे..त्याच वेळी इंग्रजी,आणि त्यावर हिंदी अशा भाषांचे ओझे का द्यायचे?"
"मराठी आणि हिंदी लिपी (देवनागरी)सारखी असली .तरी व्याकरण चिन्हे व काही उच्चार वेगळे आहेत..एक भाषा शिकताना दुसऱ्या भाषेतील फरक मुलाना गोंधळात पाडू शकेल. इयत्ता म्हणायची की कक्षा? शिक्षा म्हणजे दंड की शिक्षण?विमान की हवाई जहाज..ससा की खरगोश.. धनुष्य की धनुष..असे असंख्य गोंधळ लहान वयात निर्माण होण्या ऐवजी एका भाषेची सवय होऊ द्या मग नवी भाषा आत्मसात लवकर होईल एव्हडच… उगाच या धोरणाला विरोध म्हणजे हिंदीला विरोध असा बालिश तर्क काढून याला राजकीय स्वरूप देऊ नका..हा सामाजिक प्रश्न आहे राजकीय नाही." अशाप्रकारे गोस्वामींनी शासनाच्या निर्णयावर विरोध दर्शवला आहे.