"मालिका बंद होतेय हे निर्मात्यांनी सांगितलं नव्हतं...", 'पारू' मालिकेने अचानक एक्झिट घेण्यावर शरयू सोनावणेची प्रतिक्रिया
By कोमल खांबे | Updated: March 18, 2026 08:57 IST2026-03-18T08:56:48+5:302026-03-18T08:57:10+5:30
'पारू' मालिका अचानक बंद झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका का बंद झाली? यामागचं नेमकं कारणही समोर आलं नव्हतं. आता 'पारू' फेम शरयू सोनावणेने याबाबत प्रतिक्रिया देत मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

"मालिका बंद होतेय हे निर्मात्यांनी सांगितलं नव्हतं...", 'पारू' मालिकेने अचानक एक्झिट घेण्यावर शरयू सोनावणेची प्रतिक्रिया
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' ही लोकप्रिय मालिका अचानक बंद झाली होती. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असतानाच 'पारू' मालिकेने अचानक निरोप घेतला होता. या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र तोदेखील प्रदर्शित होऊ शकला नाही. 'पारू' मालिका अचानक बंद झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका का बंद झाली? यामागचं नेमकं कारणही समोर आलं नव्हतं. आता 'पारू' फेम शरयू सोनावणेने याबाबत प्रतिक्रिया देत मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
'पारू' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने 'पारू' मालिका बंद होण्याचं कारण सांगितलं आहे. शरयू म्हणाली, "नमस्कार मी शरयू सोनावणे म्हणजे तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू...खूप प्रतिक्षेनंतर खूप वाट बघून मी हा व्हिडीओ माझ्या प्रेक्षकांसाठी करतेय. गेल्या खूप दिवसांपासून अनेक जण सतत विचारत आहेत की पारू मालिका अचानक बंद का झाली? मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की १० फेब्रुवारी २०२६ रोजी पारू मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. ७०० भागांच्या प्रवासात तुम्ही आम्हाला साथ दिली. तुम्ही आमच्यावर भरभरुन प्रेम केलंत. त्यामुळेच आम्ही इतक्या लांबचा पल्ला गाठू शकलो. सलग २ दोन वर्ष टीआरपीमध्ये नंबर वनमध्ये असलेली मालिका ही अचानक बंद होणं अपेक्षित नव्हतं. आणि अर्थात सगळ्यांसाठी धक्कादायक होतं".
"पारू मालिका बंद होतेय याची पूर्व कल्पना आम्हाला निर्मात्यांकडून दिली गेली नव्हती. आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये असा कुठल्याच मालिकेचा शेवट झाला नाही. जसा पारू मालिकेचा झाला. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते. कारण पारू मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. प्रदर्शित करू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनमुळे या मालिकेचा शेवटचा भागही प्रदर्शित नाही झाला. पारू ही मालिका बंद झाली असली तरी आपलं नातं , तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम माझ्यासोबतच राहील. यासाठी मी कायमच तुमची ऋणी राहीन. लवकरच एका नव्या भूमिकेत, नव्या रुपात भेटू. खूप खूप आभार..", असं म्हणत तिने प्रेक्षकांची माफी मागितली.