'खिशात पैसे नसायचे, फक्त ३० रुपये...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची स्ट्रगल स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 15:16 IST2023-06-26T15:15:24+5:302023-06-26T15:16:00+5:30
Prithvik Pratap : पृथ्वीकने त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि सिनेइंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे.

'खिशात पैसे नसायचे, फक्त ३० रुपये...', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची स्ट्रगल स्टोरी
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या शोमधील कलाकार घराघरात पोहचले आहे. या शोमुळे कलाकारांच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही वाढ झाली आहे. यातील कलाकार नेहमी चर्चेत येत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील अभिनेता पृथ्वीक प्रताप(Prithvik Pratap)ने अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालून रसिकांना खळखळवून हसवले आहे. तो अनेक मालिकांमध्येही झळकला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पृथ्वीकने त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि सिनेइंडस्ट्रीतील स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीक प्रतापने त्याच्या स्ट्रगलबद्दल सांगितले. पृथ्वीक आयुष्यात अजूनही संघर्ष करतो आहे आणि त्याचे म्हणणे आहे की, आपण सगळेच मरेपर्यंत संघर्ष करणार आहोत. एक विशिष्ट जागा गाठण्यासाठी आपण कोणीच देव नाही आहे. आमचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी नेहमी म्हणतात, ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय कोणालाच चुकलेला नाही. ज्याची उत्पत्ती झाली तो स्थित्य होणार आणि तो लयीला सुद्दा जाणार… उत्पत्ती, स्थिती आणि लयीचा प्रवास करताना प्रत्येक वळणावर संघर्ष आहे.
संघर्ष कधीच कोणाला चुकलेला नाही
हा संघर्ष कधीच कोणाला चुकलेला नाही. स्थित्य माणसाला सुद्धा संघर्ष आहेच, माझ्या आयुष्यात आता सुद्धा संघर्ष आहेच पण, आता त्याचे प्रमाण पूर्वी पेक्षा कमी झाल्याचे पृथ्वीकने या मुलाखतीत म्हटले.
तेव्हाचे दिवस फार त्रासदायक होते
पृथ्वीक प्रतापने ऑडिशनच्या काळातील संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, ऑडिशनसाठी सतत धावपळ करायचो तेव्हा या स्ट्रगलचा मला सर्वात जास्त त्रास झाला. एकेकाळी खिशात पैसे नसायचे, फक्त ३० रुपये प्रवासासाठी ठेवायचो. एकदा घरून आणलेला डबा संपला की, नंतर काय खायचे असा प्रश्न पडायचा. तेव्हा मी पार्लेजी बिस्किटं खायचो. माझ्याबरोबर तेव्हा सागर जाधव, रोनक शिंदे, प्रशांत केणी, रोहित माने, चेतन गुरव, वनिता खरात, स्नेहन शिदम हे लोक असायचे. तो स्ट्रगल आम्ही एकत्र केला आहे. तेव्हाचे दिवस फार त्रासदायक होते. कोणाचेच पोट नाही भरायचे, तरीही आम्ही प्रत्येकजण एकमेकांना मदत करायचो. आम्ही तेव्हा एकत्र होतो आताही एकत्र आहोत. हल्ली परिस्थिती तुलनेने खूप सुधारली आहे म्हणून आता जेव्हा कधी भेटतो तेव्हा एकत्र हॉटेलमध्ये जातो, असे त्याने सांगितले.