"छातीत दुखल्यासारखं वाटलं, मी सुन्न झाले...", मालिका बंद होणार असल्याचं कळताच वल्लरीची 'अशी' झालेली अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:18 IST2025-10-10T12:12:26+5:302025-10-10T12:18:57+5:30
'नवरी मिळे हिटलरला' मालिका संपणार असल्याचं कळताच अभिनेत्रीची होती अशी प्रतिक्रिया, खुलासा करत म्हणाली- "पहिलीच मालिका..."

"छातीत दुखल्यासारखं वाटलं, मी सुन्न झाले...", मालिका बंद होणार असल्याचं कळताच वल्लरीची 'अशी' झालेली अवस्था
Vallari Viraj: अभिनेत्री वल्लरी विराज हे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. या मालिकेत लीलाची भूमिका साकारून तिने चाहत्यांचं प्रेम मिळवलं. अलिकडेच काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. २६ मे २०२५ ला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. त्यामुळे चाहते देखील प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाही मालिका संपणार असल्याचं कळताच अभिनेत्री मोठा धक्का बसला होता. अलिकडेच तिने याबद्दल खुलासा केला आहे.
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मालिकेतील लीला-एजेच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. मात्र, वर्षभरातच ही मालिका बंद झाली. त्याबद्दल कळताच वल्लरी विराज प्रचंड टेन्शमध्ये आली होती. नुकतीच तिने 'spill the tea with sartapes' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान बोलताना वल्लरी म्हणाली, "त्यादिवशी आईचा बर्थडे होता आणि मला सुट्टी मिळाली होती. तर बाकीचे सगळे शूट करत होते. मी गाडी चालवत होते, तेव्हा आलापिनीने मला फोन केला. तिने विचारलं की, 'आईबाबा पण आहेत का तुझ्याबरोबर?' मी हो म्हटलं... तेव्हा रात्रीचे साडे अकरा-बारा वाजले होते. मग ती म्हणाली की, फोन स्पीकरवर टाक, मला त्यांच्याशी पण बोलायचं आहे."
त्यानंतर पुढे अभिनेत्रीने म्हटलं, "मी फोन स्पीकरवर टाकून बाबांच्या हातात दिला. ती म्हणाली की- 'शर्मिष्ठा मॅम आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की, आपली सीरियल आता बंद होतेय. वल्लरीच्या आईचा वाढदिवस असल्याने तिला आता सांगू नको असे सगळे सेटवर म्हणत होते, पण मला असं वाटलं की, सेटवर आल्यावर कळण्यापेक्षा ती तुमच्याबरोबर असताना कळू दे. म्हणजे तिला वाईट वाटलं तरी तुम्ही असाल.' त्यावेळी मी सुन्नच झाले होते. एकतर पहिली मालिका असल्याने, ते एक वेगळं प्रेम होतं."
पुढे वल्लरी म्हणाली की, "छातीत दुखल्यासारखं असं काहीतरी वाटत होतं. त्यावेळी तिच्या आईने गाडी थांबवायला सांगितली आणि स्वत: गाडी चालवायला घेतली. मी मागे येऊन बसले, मला खूपच वाईट वाटलं होतं. इतके दिवस तुम्ही शूट करता, तर आयुष्यच त्याभोवती असतं. मग आता काय करायचं उद्यापासून, १५ मे ला शेवटचं शूटिंग होतं तर १६ तारखेपासून काय करायचं असं वाटत होतं. सर्वांनाच खूप त्रास झालेला. माझ्यामुळे माझ्या आई-बाबांनाही खूप त्रास झालेल, कारण मी रडत होते." अशा भावना अभिनेत्रीने मुलाखतीत व्यक्त केल्या.