सेटवर शिव्या देण्यात आल्या अन्...; आदिश वैद्यने सांगितले 'आई आणि बाबा रिटायर...' सोडण्याचे धक्कादायक कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:16 IST2025-10-09T09:12:15+5:302025-10-09T09:16:22+5:30
'आई आणि बाबा रिटायर...' मालिका सोडल्यानंतर आदिश वैदने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सेटवर शिव्या देण्यात आल्या अन्...; आदिश वैद्यने सांगितले 'आई आणि बाबा रिटायर...' सोडण्याचे धक्कादायक कारण!
Aadish Vaidya: छोट्या पडद्यावरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत आई-बाबांचं रिटारयरमेन्ट नंतरचं आयुष्य , घरगुती जबाबदाऱ्या अशी गोड कौटुंबिक नात्याची गोष्ट यातून दाखवण्यात आली. गतवर्षी २ डिसेंबरला ही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, अगदी ९ महिन्यांच्या कालावधीत ही मालिका बंद झाली. दरम्यान, या मालिकेत अभिनेता आदिश वैद्य याने मकरंद किल्लेदारचे पात्र साकारले होते. पण अचानकपणे त्याने ही मालिका सोडली होती. मात्र, त्यामागे काय कारण होतं, ते अस्पष्ट होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिश वैद्यने मालिका सोडण्याचे धक्कादायक कारण सांगितलं आहे.
नुकतीच आदिश वैद्यने 'सकाळ प्रिमिअर'ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत आदिशने अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यावेळी मालिका सोडण्याच कारण सांगताना तो म्हणाला,"जेव्हा तुम्हाला ऑनसेट कोणी आरडाओरडा, शिवीगाळ करत असेल किंवा तुमच्या अंगावर धावून येत असेल. तर मग तुमच्या आत्मसन्मानाचा विषय तिथे येतो. कारण ही गोष्ट मी एक माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून कधीच अनुभवली नाही. हिंदी असो किंवा मराठी असो मला माझ्या करिअरमध्ये आजवर नेहमीच चांगली माणसं भेटली. इथे एकमेकांशी समन्वय आणि आदर ठेवून प्रेमाने काम केलं जातं. माझा वैयक्तिकरित्या या गोष्टींवर विश्वास आहे."
त्यानंतर पुढे तो म्हणाला, "माझा तसा मुळात स्वभाव नाही मी कायम दुसऱ्यांचा आदर करतो माझीही तिच अपेक्षा असते. तर झालं असं होतं की, माझे एकावेळी दोन शो सुरु होते. त्यामुळे कधी या सेटवर तर कधी त्यासेटवर शूट सुरु असायचं होतं. या टर्मवर त्यांनी मला घेतलं होतं. हे माझ्यासाठी देखील सोपं नव्हतं. पण, त्या गोष्टीचं प्रेशर प्रोडक्शनमधील एका माणसाने घेतलं आणि त्यामुळे थोडा वाद झाला. की मला तुझे तारखा वगैरे मॅनेज करणं जमणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. पण, माझं म्हणणं हेच होतं की त्याच टर्मवर तुम्ही मला मालिकेत घेतलंय,तर मला सात दिवस द्यावे लागतील. बरं, मी ट्रॅफिमधून जेटीवरून मालिकेच्या सेटवर वेळेत पोहोचायचो.मी त्यासाठी कायम प्रयत्न आणि कष्ट केले आहेत."
वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यासाठी...
"माझे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते मी आदल्या दिवशीच ३ तासासाठी जावं लागेल अशी कल्पना त्यांना दिली होती. पण, एखाद्याला सेटवरचं वातावरण कंट्रोल होत नाही म्हणून तो माझ्या अंगावर धावून येतो. मी सांगेन तोपर्यंत सेट सोडायचा नाही, गेलास तर मी बघून घेईल, असं म्हणतो. मला ३ तासासाठी हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं , लीलावतीमध्ये माझे वडील क्रिटिकल कंडिशनमध्ये होते. मी अगोदरच कल्पना दिली होती तरीही त्या व्यक्तीने आरडाओरडा करत माझ्याकडे धावून आला. माझ्याबाबतीत असं पहिल्यांदा घडल्याने मला त्याचा खूप धक्का बसला. त्यामुळे मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, सेटवर एकानेही माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला नाही उलट तू शांत का नाही राहिलास म्हणून बोलणी बसली. मी याबाबतीत कसा शांत बसू शकलो असतो. " असा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला आहे.