"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या?
By देवेंद्र जाधव | Updated: June 11, 2025 13:58 IST2025-06-11T13:58:24+5:302025-06-11T13:58:48+5:30
कविता मेढेकर यांंनी तब्बल ११ वर्ष टेलिव्हिजनवर चाललेल्या 'चार दिवस सासूचे' मालिकेविषयी त्यांचं मत व्यक्त केलंय.

"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या?
ई टीव्ही मराठीवरील 'चार दिवस सासूचे' ही मालिका चांगलीच गाजली. संध्याकाळी सुरु होणारी ही मालिका टीव्हीवर हमखास बघितली जायची. आजही मराठी टेलिव्हिजन विश्वात सर्वात जास्त एपिसोड करणाऱ्या मालिकांमध्ये 'चार दिवस सासूचे' मालिकेचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. या मालिकेत रोहिणी हट्टंगडी, कविता मेढेकर या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री कविता मेढेकर यांनी या मालिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
तेव्हा सोशल मीडिया असतं तर...
कविता मेढेकर यांनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं की, "तेव्हा जर सोशल मीडिया असता तर चार दिवस सासूचे एवढी ट्रोल झाली असती ना! त्यामुळे १० - ११ वर्ष कसं शूटिंग केलं असतं आम्ही. डेली सोप केल्यावर तुम्हाला वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी कोमामधून उठून बाहेर चालत वगैरे आलेय, असा सीन होता. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण आता त्याला काही इलाज नाही. पण आम्ही त्या केल्या. सुदैवाने तेव्हा सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे वाचलो."
"आता काय असतं, जरा आम्ही डेली सोपमध्ये काही वेगळं केलं की, सोशल मीडियावर आम्ही एवढं ट्रोल होतो. हे दोन्ही बाजूने असतं. जसं तुम्हाला ट्रोल करतात तसं तुमचं कौतुकही करतात." अशाप्रकारे कविता मेढेकर यांनी 'चार दिवस सासूचे' मालिकेबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. कविता मेढेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्या नुकत्याच 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत दिसल्या. याशिवाय त्या सध्या प्रशांत दामलेंसोबत 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकात काम करत आहेत