"तुम्ही कितीही उच्च दर्जाचे कलाकार असाल तरी...", टीव्हीवर काम करण्याबाबत ऐश्वर्या नारकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:43 IST2026-02-03T16:41:02+5:302026-02-03T16:43:42+5:30
"सतत १२-१२ तास…", टीव्हीवर काम करण्याच्या निर्णयाबद्दल ऐश्वर्या नारकर काय म्हणाल्या?

"तुम्ही कितीही उच्च दर्जाचे कलाकार असाल तरी...", टीव्हीवर काम करण्याबाबत ऐश्वर्या नारकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...
Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहेत. 'स्वामिनी', 'या सुखोंना' या तसेच 'श्रीमंताघरची सून', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी टीव्हीवर काम करण्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.
अलिकडेच ऐश्वर्या नारकर यांनी अमोल परचुरेंच्या कॅचअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या,"खरंतर, मला सगळ्याच माध्यमात काम करायला आवडतं.
मला टेलिव्हिजन आणि चित्रपट असा फरक करणं जमत नाही. मी फक्त फिल्मच करेन किंवा मालिका करणार नाही, असं मला करता येत नाही. मला सगळ्यातच मजा येते.
जर मला दोन प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी विचारलं, तर त्यात एक फिल्म असेल आणि एक मालिका असेल. तर मला जे पात्र आवडतं, त्याला मी प्राधान्य देते. मला जर मालिकेतील पात्र आवडलं असेल तर मी मालिका करते."
मग पुढे त्या म्हणाल्या,"बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, तुम्ही टेलिव्हिजन काय काम करता? टीव्हीवर तर तुम्ही रोज दिसता, त्यामुळे तुमचं महत्व कमी होतं. पण, मला उलट असं वाटतं, तुम्ही सतत दिसत राहून तोच घिसपिटा ड्रामा प्रेझेंट करत असलात तरी सुद्धा ती २० मिनिटे जिथे तुमच्या प्रेक्षकांना चॅनेल बदण्याची संधी असते. पण, तुमच्या पात्रामुळे प्रेक्षक जर तो शो बघत असतील तर ते क्रेडिटेबल आहे."
सतत १२-१२ तास काम करणं...
"डेलीसोपचं लिखाण करणं सोपं नाहीये, त्याचं दिग्दर्शन सोपं नाही. सतत १२-१२ तास काम करणंही सोपं नाहीये.त्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही तुमचे पात्र छान पद्धतीने साकारून लोकांपर्यंत पोहोचणं आणि तुमच्या पात्रासाठी लोकांनी तो शो बघणं हे मला छान वाटतं.मला ते खूप कमी दर्जाचं वाटत नाही."
टेलिव्हिजनला कमी लेखणाऱ्यांबद्दल ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "तुम्ही समाजमनात कितीही उच्च दर्जाचे असाल आणि टेलिव्हिजनवर काम करताना तुम्ही तुमच्या पात्रांतून प्रेक्षकांना थांबवू शकत असाल असं नाहीये. कारण, तिथे काम करण्याची परिस्थिती वेगळी असते. तुम्हाला दहा सीन्स करावे लागतात. तु्म्हाला खूप आयत्या वेळी सीन दिला जातो. त्यात बऱ्याचदा लोकेशनला प्राधान्य देऊन सीन्स लावले जातात. त्यामुळे स्क्रीन प्लेनुसार सीन्स नसतात. या सगळ्या पातळ्यांवर जरी पाहिलं तरी ते काम सोपं नाही आणि दुसरं म्हणजे ते तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे." असं मत ऐश्वर्या नारकर यांनी मुलाखतीत मांडला.