"आत्महत्या हा कशावरच उपाय नाही...", तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणानंतर मराठी अभिनेता हळहळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 11:46 IST2025-06-22T11:42:04+5:302025-06-22T11:46:37+5:30
तुषार घाडीगावर आत्महत्या प्रकरणानंतर मराठी अभिनेता हळहळला, व्यक्त केलं दु:ख

"आत्महत्या हा कशावरच उपाय नाही...", तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणानंतर मराठी अभिनेता हळहळला
Shreyas Raje Post: विविध मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार अभिनेता तुषार घाडीगावकरच्या आत्महत्या केल्याचं वृत्त ऐकून सर्वांना च धक्का बसला आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'सुखांच्या सरींनी हे मन बावरे', यांसारख्या मालिकांमधून त्याने काम केलं आहे. परंचु, तुषारने अचानक टोकाचा निर्णय घेऊन स्वत च जीवन संपवल्याने कलाकार देखील हळहळले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तुषारसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात आता मराठी अभिनेता श्रेयस राजेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
तुषार घाडीकरच्या निधनाची बातमी समजताच मराठी कलाकारांसह त्याचे चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेता श्रेयस राजेने तुषार घाडीगावकरच्या निधनासंदर्भात पोस्ट लिहून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. या पोस्टला भावुक कॅप्शन देत त्याने लिहिलंय, "मनात तीव्रतेने जे आलं ते व्यक्त झालो आहे! आपण कसे दिसायला लागलोय? आपल्या चेहऱ्यावर निराशेचे किती थर चढले आहेत? आपण नेमक्या कुठल्या गर्तेत आहोत? आपल्याला नेमकं काय आणि किती छळतंय? आत काय काय जळतंय? काय काय शमवावंस वाटतंय? आपण खरंच मनसोक्त जगतोय की जगण्याचा भास निर्माण करतोय? खोल खोल खोल आत काय दडलंय आणि उसन्या चढवलेल्या चेहऱ्यावर देखावा म्हणून काय सोडलंय? खरंच ऊर भरून आनंदाने श्वास घ्यावासा वाटतोय की तोच श्वास दाबून टाकवासा वाटतोय? हे सगळं आपलं आपल्याला चांगलंच ठावूक असतं! वेळोवेळी जाणवत असतं. पाठीवर बसलेल्या वेताळासारखं हे सगळं आपण कधीतरी वागवतच असतो जगताना. ज्याला आपण वैद्यकीय भाषेत डिप्रेशन, अँक्साईटी, मेंटल इलनेस इत्यादी इत्यादी बरंच काही म्हणत असतो. पण सोप्या शब्दात ह्याला “मी बरा किंवा बरी नाहीय, माझं मन बरं नाहीये, माझं चित्त थाऱ्यावर नाहीये, माझा मेंदू शांत नाहीये, मला आधार हवाय, मी अडकलोय, मला बोलायचंय कुणशीतरी, माझ्याशी बोला!!!” असं म्हणतात! म्हणतो का आपण असं सगळं उघड करुन कोणाजवळ? म्हणत असू तर उत्तमच! पण जे म्हणत नाहीत, म्हणू शकत नाहीत त्यांचं काय होतं?
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "ते असे काल परवा पर्यंत आपल्याला दिसतात कुठेतरी वरवरचं हसताना आणि एक दिवस कधीतरी विष पिऊन, पंख्याला लटकून, ट्रेन खाली किंवा ट्रक खाली येऊन, उंच इमारतीवरून उडी घेऊन संपवतात स्वतःचं आयुष्य. त्यांच्यासाठीचं जग संपतं! पण प्रश्न सुटतो? जाणाऱ्यापुरता सुटतही असेल. पण उरणाऱ्यांचं काय? आपण कुणीच अमरत्वाचं वरदान घेऊन जन्माला आलेले नाहीचोत. मरण अटळ आहे. अंतिम सत्य आहे! पण ते आपल्याच हाताने स्वतःवर ओढवून घ्यायच्या आधी काहीच पर्याय उरत नसतो का? आपण इतके हतबल का होत असतो? जगात असं कुठलं नं सुटणारं कोडं असतं की जे आपला जीव आपल्याच हातून हिरावून घेतं?? खरंतर कुठलंच नाही! मग आपण आपलंच आयुष्य इतकं जटील का करुन टाकतो? जगायला, जिवंत राहायला जगण्यातली बेफिकिरी लागते असं मला ठामपणे वाटायला लागलं आहे. कितीही अवघडातली अवघड परिस्थिती असेल, आपल्याच चुकांमुळे ती आपल्यावर ओढवली असेल किंवा कुठलाच मार्ग उरला नाहीये असं वाटत असेल तरी ‘बिनधास्त जगा मित्रांनो!! कितीही कठीण वाटत असलं तरी जगणं सुंदर आहे. फारफारतर काय होईल?? त्रास सहन करण्याचे दिवस वाढतील. पण त्रास संपणारच नाही, प्रश्न सुटणारच नाहीत असं अजिबात नाही. वेळ, काळ आणि परिस्थिती सतत बदलत असते हा सृष्टीचा नियम आहे. आकस्मिक किंवा नैसर्गिक मृत्यू येईपर्यंतचं आयुष्य निरंतर आहे. वाहणारं आहे. क्षणोक्षणी बदलणारं आहे. कायमस्वरुप कशालाच नाही. जसं सुखाला नाही तसंच दुःखालाही नाहीच. जे आहे जसं आहे ते खरं बोला! व्यक्त व्हा!! मनावर चढवलेले सगळे पडदे फाडून टाका. स्पष्ट शब्दात नागडे व्हा! सहजासहजी आपल्याला हे जमत नाही. पण प्रयत्न करण्याची सुरुवात तर आपण करुच शकतो.. नाही का? नेमकं हेच करायला आपण घाबरत असतो. कशाची भीती वाटत असते आपल्याला? लोक आपलं हसं करतील ह्याची? आपली लायकी काढतील ह्याची? आपण कसे नाकर्ते आहोत याची चवीचवीने चर्चा करतील ह्याची?? की आपल्याला कमीपणा पत्करावा लागेल ह्याची? भीती ही जगण्यामधली आवश्यक भावना आहे असं म्हणतात. पण मग वाटूनच घ्यायची असेल तर स्वतःचा जीव घेतानाही भीती वाटू द्या. मी गेल्यानंतर माझ्या मागे असणाऱ्यांचं काय? स्वतःला ह्या सगळ्यातून मोकळं करताना आपण आपल्यामागे बऱ्याच जणांना कोंडून जाणार आहोत ह्याची एकदातरी जाणीव होऊद्या! पावलं वळायला नक्की मदत होईल! "
मानसिक समस्येला इतकं मोठं कधीच होऊ देऊ नका...
"व्यवसायातलं अपयश, कर्ज, कौटुंबिक समस्या, स्वतःचा अतीव राग, अपराधीपणाची भावना, नैराश्य, फसलेली प्रेम प्रकरणं, आयुष्याच्या शर्यतीत मागे पडत जाण्यामुळे तयार झालेली घुसमट इत्यादी इत्यादी काहीही कारण असलं, तरी या कशावरच आत्महत्या हा उपाय नाही. असलीच तर ती पळवाट आहे. निर्सर्गाने जे आयुष्य नं मागता आपल्याला दिलं आहे ते संपवण्याचा दुसऱ्यांप्रमाणेच आपल्या स्वतःलाही अधिकार नाही. मानसिक आरोग्य ताळ्यावर नसणं हे मनुष्य जन्माचं बायप्रोडक्ट आहे. त्याच्याकडे बायप्रोडक्ट म्हणूनच पहायला हवं. कुठल्याही मानसिक समस्येला इतकं मोठं कधीच होऊ देऊ नका ज्याने तुमचं अस्तित्वच नष्ट होईल. आत्महत्त्या करण्याचा विचार करण्यापासून कृती करतानाच्या क्षणापर्यंत त्या व्यक्तीच्या डोक्यात नेमकं काय सुरू असतं ह्याचं गूढ अजूनही आपल्याला उकललं नाहीय. ते करणाऱ्यालाच ठावूक! पण तो ‘विचार ते कृती’ च्या मधली वेळच खूप महत्वाची. आपल्या अवतीभवती बघा, आपल्या ओळखीतला कोणी ह्या मधल्या कैचित सापडला तर नाहीय ना ह्याची सतत चौकशी करत राहा. जितकं निराश माणसाने व्यक्त होणं गरजेचं तितकंच सुदृढ माणसाने त्याचा कान होणं, त्याचं ऐकणं, तो एकटा नाहीय ह्याची त्याला जाणीव करुन देणं महत्त्वाचं! कुणाचातरी हात हातात घेऊन एक अवघड पूल ओलांडण्याची गरज असते. तो ओलांडल्या नंतरचं गाव सुंदर असतं! आपल्याला तो हात हवा असेल तर तो मागायला लाजू किंवा कचरू नका. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!! तुषार घाडीगावकर (घाडी) तुला भावपूर्ण श्रद्धांजली!!" अशी विचार करायला लावणारी पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे.