ऑनलाईन ओळख अन् पहिल्या भेटीत ६ तास गप्पा! 'असं' जमलं अंशुमन-अपूर्वाचं लग्न, लव्हस्टोरीबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:02 IST2026-03-20T11:53:03+5:302026-03-20T12:02:52+5:30
अपूर्वा गोरे अन् अंशुमन जोशीचं लग्न कसं जमलं? 'अशी' झाली होती पहिली भेट, किस्सा आहे इंटरेस्टिंग

ऑनलाईन ओळख अन् पहिल्या भेटीत ६ तास गप्पा! 'असं' जमलं अंशुमन-अपूर्वाचं लग्न, लव्हस्टोरीबद्दल म्हणाले...
Anshuman Joshi And Apurva Gore Lovestory: मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. त्यापैकीच एक जोडी म्हणजे अंशुमन जोशी आणि अपूर्वा गोरे. शाळा या चित्रपटात मुकुंदची भूमिरा साकारुन अंशुमन जोशीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तर अपूर्वाने आई कुठे काय करते मालिकेत ईशाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. अलिकडेच ८ मार्च २०२६ रोजी अपूर्वा आणि अंशुमन यांनी लग्न केलं.परंतु अंशुमन आणि अपूर्वा यांची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली होती माहितीये का?
नुकतीच अपूर्वा गोरे आणि अंशुमन जोशी या दोघांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांची पहिली भेट आणि नंतर लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.यावेळी अपू्र्वा म्हणाली, "आमच्यासाठी देखील हे सरप्राईज होतं होतं. कारण, एकदम चट मंगनी पट ब्याह असं झालं. आम्ही ऑनलाईन एकमेकांना भेटलो. या पहिल्या भेटीतच काहीतरी क्लिक झालं.एकाच इंडस्ट्रीतील असल्यामुळे भेटून घेऊया अशा अनुशंगाने मी त्याला भेटले. त्यावेळी जवळपास ६ तास आम्ही एकत्र होतो आणि खूप गप्पा मारल्या. त्यानंतर त्याने मला घरी सोडल्यानंतरही आम्ही रात्रभर चॅट करत होतो. त्यानंतर आपल्या मनात एकमेकांविषयी काहीतरी आहे, याचा आम्हाला अंदाज आलाच होता. आमचं लग्न वगैरे करूयात असं काही ठरलं नव्हतं." मग पुढे अपूर्वा म्हणाली, मी खूप ओव्हरथिंक करणारी मुलगी आहे. मुळात मी जेव्हा लग्नाबद्दल विचार केला होता...तेव्हा माझा पार्टनर हा या क्षेत्रातला नसावा, असं माझं म्हणणं होतं."
त्यानंतर मुलाखतीत अंशुमन जोशी म्हणाला," पहिल्या भेटीत आपण आकर्षित होतो. आमच्या बाबतीत तसं झालं नाही. आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावरून असं लक्षात आलं की आपण एकमेकांशी कशावरही कुठल्याही विषयावर बोलू शकतो. त्यात आपल्याला काही फिल्टर ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर मी तिला विचारलं आपण एकमेकांशी अजून बोलूयात... एकतर आपलं होईल किंवा आपल्यात मैत्री होईल.मग आम्ही आठवडाभर एकमेकांशी खूप बोललो. मी मुंबईत तर ती पुण्यात होती. त्यावेळी माझा मोबाईल खराब झाला होता, त्यामुळे मी लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप वेबवरून बोलत होतो. अशा आमच्या खूप चर्चा झाल्या. त्यामुळे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मला तिच्यासमोर सहज व्यक्त होता येतं.
"मग आठवडाभरानंतर ती म्हणाली, मला आणि माझ्या आईला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात किंवा आम्ही जी कल्पना केली आहे. त्या गोष्टी तुझ्याबाबतीत घडतील, असं आम्हाला वाटत नाही. तिने मला हे ज्या पद्धतीने सांगितलं त्यात स्पष्टता होती. या सगळ्यानंतर आमच्यात चांगली मैत्री झाली.पण, काही काळानंतर एक सिनेमा आयु्ष्यात आला. त्यातील गाणी हे यासाठी महत्त्वाचं कारण ठरलं. त्यादरम्यान, असं झालं की आपल्याला एकमेकांची आठवण येतेय. आपल्याला काहीतरी वेगळं सांगावसं वाटतंय." असं अंशुमनने .यावेळी सांगितलं.
यापुढे अपूर्वाने सांगितलं," त्या कालखंडात जेव्हा आम्ही एकमेकांशी बोलायचो. फोन करायचो, काही गोष्टी शेअर करायचो. तेव्हा असं झालं... अरे,ही गोष्ट मला यालाच सांगाविशी वाटतेय. तो खूप सिनेमे बघतो. त्याचा सिनेमांचा खूप चांगला अभ्यास आहे. जर त्याने एखादा चांगला सिनेमा बघितला तर त्याला ते मला सांगावसं वाटायचंय. माझ्याबाबतीतही अगदी तसंच होतं. ती एक मैत्री कुठेतरी पुढे जातेय हे आम्हाला कळू लागलं. एकमेकांची खूप आठवण यायला लागली. मग मीच त्याला म्हणाले, आपण परत त्या निर्णयाकडे वळूयात का? यावेळी हा माझा निर्णय होता. तेव्हा असं झालं की कुठलाही निर्णय घेण्याआधी आपण आपल्याला एकत्र आणलं पाहिजे. कारण, लग्न हे कुटुंबाशिवाय होणं शक्य नव्हतं."