'देवमाणूस-मधला अध्याय'मधील लालीचं स्वप्न पूर्ण होणार, गोपाळशी बांधणार लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:37 IST2025-07-14T16:37:30+5:302025-07-14T16:37:50+5:30
Devamanus-Madhala Adhyay : 'देवमाणूस- मधला अध्याय' प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्याला मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत.

'देवमाणूस-मधला अध्याय'मधील लालीचं स्वप्न पूर्ण होणार, गोपाळशी बांधणार लग्नगाठ
झी मराठीवरील थरारक मालिका 'देवमाणूस- मधला अध्याय' (Devamanus-Madhala Adhyay) प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्याला मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्यं, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या मालिकेत लाली-गोपाळच लग्न आहे, यात एकाचवेळी अनेक मोठे प्रसंग घडणार आहेत जे संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहेत.
एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजीत यांच्यात जोरदार वाद उफाळतो. अजीतला इतक्या सहज जमीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच काळात पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरु होतात. लालीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. पण हा आनंद किती काळ टिकणार हे कोणीच सांगू शकत नाही. दुसरीकडे, अजीत एक धक्कादायक पाऊल उचलतो. लग्न आटपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गुपचूप गाडतो. रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत तो हे प्रकरण हातावेगळं करतो आणि वेळेवर गोंधळासाठी घरीही पोहोचतो. पण अजीतच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे.
सोनम म्हसवेकर म्हणजेच लालीने लग्नाच्या सीन बद्दल बोलताना सांगितलं की,"आमच्या वाड्यापुढेच फार सुंदर मंडप उभा केला गेलाय. मेहंदी, घाणा भरणी, चुडा भरण्याचा कार्यक्रम, हळद, लग्न, हे सर्व तिथेच शूट झालं आणि इतकच नाही तर अजून गृहप्रवेश, गोंधळ शूट बाकी आहे. हळदीमध्ये बैंड वाजला तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण आली. आगरी समाजामध्ये मी लहानाची मोठी झाले. तिथे हळदीला असाच बॅण्ड आणि अशीच गाणी वाजवली जातात. पूर्ण पारंपरिक पद्धतीने, रीतिरिवाजाने गोपाळ-लालीच लग्न शूट होत आहे. रोज मला नवरी म्हणून छान लूकमध्ये तयार केलं जात आहे. खरं सांगू तर मला ह्या पारंपरिक पद्धती, रीती, गाणी ह्याचं फार कुतूहल आहे. मला मालिकेतली लग्न फार आवडतात. तब्बल ८ ते १० दिवस माझं लग्न शूट होतंय. संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजूनच मजा येते आहे."
ती पुढे म्हणाली की, "मला एक किस्सा सांगायला आवडेल इथे आम्ही एक लग्नाचा रील व्हिडीओ शूट केला नवरी नटली गाण्यावर जो तुम्ही सर्वानी पहिली असेलच, तो व्हिडीओ शूट करण्यासाठी जी आमची मेहनत गेली आहे, कारण सर्वजण एकत्र मिळणं कठीण होतं. पूर्ण दिवस निघून गेला आणि मध्यरात्री आम्ही ती रील शूट केली, जेव्हा किरण म्हणजेच गोपाळचा एक क्लोज सीन लागला होता आणि त्यांनी दिग्दर्शक सरांना विनंती केली आम्हाला ती रील शूट करायला वेळ देण्यासाठी, सरांनी आम्हाला थोडा वेळ दिला आणि सर आम्हाला तो व्हिडीओ शूट करताना पाहून खूप हसत होते."
या सर्व घडामोडींमुळे मालिकेमध्ये एक नवा थरारक टप्पा सुरू होणार आहे. अजीतचा गुन्हा उघडकीस येणार का? मनीषा खरं सांगणार का? गोपाल आणि लालीचं सुखाचं आयुष्य सुरू होणार की त्यातही अडथळे येणार? की अजूनही एक नवीन रहस्य समोर येणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.