'इंद्रायणी' मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा; इंदू म्हणते- "विठुरायाच्या कृपेने मला आपलंसं केलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:57 IST2025-12-23T16:56:49+5:302025-12-23T16:57:04+5:30
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ने आपल्या यशस्वी प्रवासात ६०० भागांचा टप्पा गाठला आहे. या खास प्रसंगी मालिकेच्या सेटवर कलाकारांसह संपूर्ण तांत्रिक टीमने एकत्र येत हा आनंदाचा क्षण साजरा केला.

'इंद्रायणी' मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा; इंदू म्हणते- "विठुरायाच्या कृपेने मला आपलंसं केलं..."
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ने आपल्या यशस्वी प्रवासात ६०० भागांचा टप्पा गाठला आहे. या खास प्रसंगी मालिकेच्या सेटवर कलाकारांसह संपूर्ण तांत्रिक टीमने एकत्र येत हा आनंदाचा क्षण साजरा केला. केक कापून, आठवणींना उजाळा दिला. सेटवरील वातावरण आनंदी आणि भावनिक झालं होतं. प्रेक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रेमामुळे आणि टीमच्या मेहनतीमुळे इंद्रायणी आजही तितक्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान टिकवून आहे.
या खास क्षणाबद्दल मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी अभिनेत्री कांची शिंदे म्हणाली ,“‘इंद्रायणी’चे ६०० भाग पूर्ण करणे म्हणजे माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही, तर एक सुंदर प्रवास आहे. इंदूची भूमिका जगताना मी स्वतःही खूप काही शिकले. जेव्हा मालिकाची विचारणा मला झाली तेव्हा अनेक प्रश्न माझ्या मनात होते, मी हे पात्र कसे साकारेन, प्रेक्षक मला स्वीकारतील का ? विठुरायाच्या कृपेने मला आपलंसं केलं, मी लोकांना आवडू लागली. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हे शक्य झाले आहे. नाशिकमध्ये तिन्ही ऋतू खूप एक्सट्रिम असतात, त्याच्याशी झुंज देत आज आम्ही ६०० भाग पूर्ण केले आहेत याचा आनंद आहे. ही शाबासकी फक्त कलाकारांची नाही, तर कॅमेऱ्यामागे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे. म्हणूनच या आनंदाच्या क्षणी आम्ही कॅमेऱ्यामागील टीममधील सगळ्यांना कॅडबरी देऊन त्यांचं मनापासून कौतुक केलं. कारण हा प्रवास आम्हा सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न आहे.”
सध्या ‘इंद्रायणी’ मालिकेत कथा अत्यंत थरारक वळणावर आली आहे. इंदू–अधोक्षजसमोर मोहितराव शाळेच्या भागीदारीचा वाद थेट पंचायत निर्णयापर्यंत नेण्याचं उघड आव्हान देतो; अधोक्षज परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण पुढच्याच दिवशी पोलिस त्याच्या दारात येतात आणि एका गंभीर आरोपाखाली त्याला अटक करण्यासाठी सज्ज होतात. या धक्कादायक घडामोडींनंतर सत्याचा शोध सुरू होतो—इंद्रायणी ठामपणे अधोक्षजच्या बाजूने उभी राहते, काही अनपेक्षित कबुल्या सगळ्यांना थक्क करतात, तरीही इंदूच्या मनात खरा दोषी वेगळाच असल्याचा संशय कायम राहतो. त्याचा शोध इंद्रायणी घेणार, अधोक्षज निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवणार आणि खऱ्या गुन्हेगाराला शोधून शिक्षेचा पात्र बनवणार. त्यामुळे पुढचे भाग खूपच रंजक रंगणार आहेत.
हे सगळं घडत असताना कथेत, आनंदाच्या आड काहींचे गुप्त हेतू लपलेलेच राहतात; इंद्रायणी–श्रीकला यांच्यातील सूक्ष्म तणाव कथेला अधिकच गूढ व उत्कंठावर्धक बनवतो. इंद्रायणी अधोक्षजला निर्दोष कसं सिद्ध करून दाखवणार? या सगळ्या घडामोडी पुढे काय वळण घेणार, हे पाहण्यासाठी ‘इंद्रायणी’ चे आगामी भाग नक्की पहा — सोम ते शनि, रात्री ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर