इतिहास युद्धानेच नव्हे तर प्रेमकथानीही गाजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 13:17 IST2016-09-23T07:31:29+5:302016-09-23T13:17:37+5:30
EXCLUSIVE आपल्या इतिहासाबाबतचा साधा विचार देखील मनात आल्यास राजा-महाराजांमध्ये घडलेल्या तुफान युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. त्यामुळे इतिहास म्हणजे ...
.jpg)
इतिहास युद्धानेच नव्हे तर प्रेमकथानीही गाजला
आपल्या इतिहासाबाबतचा साधा विचार देखील मनात आल्यास राजा-महाराजांमध्ये घडलेल्या तुफान युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. त्यामुळे इतिहास म्हणजे ‘युद्ध’ हीच धारणा आपली झाली आहे. वास्तविक इतिहासाचा अभ्यास केल्यास अनेक रंजक गोष्टी समोर येतात. आपला इतिहास जेवढा युद्धाच्या प्रसंगांमुळे गाजलेला आहे, तेवढाच प्रेमकथानीही गाजला आहे. या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्यास नक्कीच त्यांना त्या बघावशा वाटतील, असे मत टिव्ही क्वीन एकता कपूर हिने व्यक्त केले. तिच्या आगामी ‘चंद्र-नंदीनी’ या नव्या ऐतिहासीक मालिकेच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : ‘सास-बहु’च्या मालिकानंतर थेट ऐतिहासीक विषयावर मालिका काढण्याची कल्पना कशी सुचली?
उत्तर : ऐतिहासिक विषयावर मालिका करावी, असा विचार मी पूर्वीच केला होता. त्यातच मला ‘चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य’ या दोन इतिहास पुरुषांचे पूर्वीपासूनच आकर्षण राहिल्याने मी हा विषय निवडला. मालिकेत चंद्रगुप्त मौर्य या पात्राबरोबरच चाणक्य हे पात्र देखील तेवढेच ताकदवान आहे. यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या वीरगाथांबरोबरच त्यांची प्रेमकथा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक ही प्रेम कथा प्रतिशोधाच्या भावनेने घडलेली असल्याने यामध्ये अनेक ट्विस्ट बघावयास मिळणार आहेत. मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात सर्व कलाकारांची एकमेकांसोबत जुळलेल्या केमिस्ट्रीमुळे हे शक्य झाले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची मला खात्री आहे.
प्रश्न : श्वेता बासु प्रसाद हिची निवड कशी केली?
उत्तर : मी अगोदरच स्पष्ट करते की, श्वेता खुपच टॅलेन्टेड कलाकार आहे. त्यामुळे तिची निवड होणे स्वाभाविक होते. या भूमिकेसाठी १५० ते २०० स्त्री कलाकारांचे आॅडिशन घेतले गेले. त्यातून श्वेताची निवड झाली. आज ती मालिकेत मुख्य भूमिकेत असण्याचे एकमेव कारण म्हणजे तिच्यातील गुणवत्ता होय. श्वेताने यापूर्वी देखील ‘कहानी घर घर की’ या मालिकेत काम केले आहे. तिच्याकडे अनुभव असल्याने तिने ही भूमिका समर्थपणे निभावली. माझ्या मते, ऐतिहासीक विषयावरील या मालिकेसाठी श्वेताची निवड योग्य आहे.
प्रश्न : मुख्य भूमिकेत असलेल्या रजत टोकस आणि दिग्दर्शक संताराम यांच्यात भिनसल्याचे समजते. यामुळे मालिकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, काय सांगशील?
उत्तर : मला असे वाटते की, आपण याचा फारसा विचार न करता मालिकेच्या सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रीत करायला हवे. कंपनीत चार ते पाच दिग्दर्शक वेगवेगळ्या मालिकांवर काम करीत आहेत. त्यामुळे रजत आणि संताराम यांच्यातील वाद माझ्यादृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही. रजत अतिशय चांगला कलाकार आहे. यापूर्वी देखील त्याने मायथोलॉजिकल भूमिका साकारली आहे. जोधा अकबर या मालिकेत त्याने मोघल सम्राट अकबर याची भूमिका साकारली होती. त्यामुळे तो या भूमिकेसाठी अगदी योग्य होता. शिवाय त्याने त्याच्या भूमिकेला न्याय देखील दिला आहे. श्वेता आणि रजत यांच्यातील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.
प्रश्न : मालिकेच्या शुटिंगसाठी वास्तविक स्थळांचा वापर केला गेल्याचे बोलले जाते?
उत्तर : नाही! मालिकेची शुटिंग ही बहुधा नियोजित सेटवरच केली जात असते. त्यामुळे मालिकेत बाहेरचे लोकेशन दिसेल ही केवळ चर्चा आहे. पाटणा येथे पाटलीपुत्र व मगध यांचे अस्तित्त्व होते. त्यामुळे मालिकेचा काही भाग याठिकाणी चित्रीत केला जाईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु ही केवळ चर्चाच आहे. वास्तविक कुठल्याही मालिकेचे शुटिंग हे नियोजित सेटवरच करणे अपेक्षित असते. बजेट व इतर बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी सेट हे एकमेव आॅप्शन निर्मात्यांसमोर असते.
प्रश्न : प्रेक्षकांची आवड बघता ऐतिहासिक मालिकेला कितपत पसंती दिली जाईल?
उत्तर : यापूर्वी आलेल्या अनेक ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. मुळात गेल्या एक वर्षांपासून मी या विषयावर काम करीत होते. त्यामुळे स्वाभाविकपणे मला या मालिकेपासून सर्वच पातळ्यांवर खुप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांच्या आवडी-निवडी जरी बदलल्या असल्या तरी, त्यांच्यासमोर चांगली कलाकृती मांडल्यास ते त्यांच्या नक्कीच पसंतीस उतरते. हाच प्रयत्न मी या नव्या मालिकेच्या माध्यमातून केला आहे. चांगले अन् उत्तम पात्र रेखाटून एक परिपुर्ण कथा मी मांडली आहे. अर्थात यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करावी लागली.
प्रश्न : तुझ्या नजरेतून टीव्ही मालिका अन् प्रेक्षक हे समीकरण कसं जुळवतेस?
उत्तर : सोपं आहे, प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार कलाकृती पोहचणे अन् त्यातून त्यांचे प्रेम मिळवणे हेच समीकरण आहे. हल्ली प्रेक्षक चोखंदळ झाला असल्याने तो चांगल्या आणि वाइट कलाकृतीची लगेचच समीक्षा करतो. मला असं वाटते की, आपण प्रेक्षकांच्या आवडी लक्षात घेवून विषयाची निवड करायला हवी. सध्या घरगुती कथांबरोबर ऐतिहासिक कथा प्रेक्षकांना आवडत असल्याने या विषयांवरील मालिकांची संख्या वाढत आहे. मी या दोन्ही फॉरमॅटमध्ये काम करीत आहे. मात्र ऐतिहासिक विषय निवडताना त्यात जोखिम अधिक असते. कारण प्रेक्षकांपर्यंत इतिहास हा अचुकपद्धतीनेच पोहचायला हवा. चंद्रगुप्त मौर्य साकारण्यासाठी मी गेल्या एक वर्षापासून यावर काम करीत होते. कारण त्यातील चाणक्य हे पात्र साकारणे खरच आव्हानात्मक होते. मात्र या पात्राचे मला सुरुवातीपासूनच आकर्षण राहिल्याने ते उत्तमपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
satish.dongare@lokmat.com