११ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाच्या चर्चा; अभिनेता करण पटेलच्या पत्नीने अखेर सोडलं मौन, म्हणाली-"लग्नाच्या वेळी मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:12 IST2026-04-09T17:09:11+5:302026-04-09T17:12:03+5:30
"लग्नाच्या वेळी मला...", 'ये है मोहब्बतें' फेम करण पटेलच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत , घटस्फोटाबद्दल काय म्हटलं?

११ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाच्या चर्चा; अभिनेता करण पटेलच्या पत्नीने अखेर सोडलं मौन, म्हणाली-"लग्नाच्या वेळी मला..."
Television: छोट्या पडद्यावरील शाहरुख खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे करण पटेल.'कसौटी जिंदगी की', 'कस्तुरी', 'कहानी घर घर की', 'ये है मोहब्बतें' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. मात्र, गेल्या काही काळापासून अभिनेता अभिनय क्षेत्रापासूवन दुरावला आहे.करिअरच्या शिखरावर असताना त्याला कामं मिळणं बंद झालं. अलिकडेच तो द ५० या शोमध्ये पाहायला मिळाला. परंतु, तो या शोमध्ये फार काळ टिकू शकला नाही. सध्या करण पटेल हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या ११ वर्षांनंतर करण आणि त्याची पत्नी अंकिता भार्गव घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा सगळीकडे वाऱ्यासारख्या पसरू लागल्या आहेत. अखेर यावर अभिनेत्याची पत्नी अंकिता भार्गवीने मौन सोडलं आहे.
अलिकडेच 'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने पती करण पटेलपासून विभक्त होण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या मुलाखतीत अंकिता म्हणाली,"या सगळ्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. जे लोक करणबद्दल चुकीचं बोलत आहेत, ते त्यांचे शब्द आहेत. दोन वर्षांनंतर त्यांना या गोष्टीची जाणीव होईल. त्यामुळे मी कोणाबद्दल चुकीचं बोलून माझे पाप का वाढवू?"
त्यानंतर मग मुलाखतीत अंकिताने म्हटलं, "मला ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही आणि मी त्याच्याबद्दल विचारसुद्धा करत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे सर्वांबद्दल चांगलं बोला आणि चांगले विचार करा. आमच्या लग्नाला आता ११ वर्षे झाली आहेत आणि लग्नाच्या वेळीही मला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.त्यामुळे आता मी फक्त लोकांच्या सकारात्मक बोलण्याचा
विचार करते.", अशा शब्दांत अंकिताने नाराजी व्यक्त केली.