गायत्री दातारनं व्यक्त केली 'हिंदी बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:40 IST2025-08-18T13:39:01+5:302025-08-18T13:40:19+5:30
गायत्रीने 'बिग बॉस हिंदी'मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गायत्री दातारनं व्यक्त केली 'हिंदी बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाली...
Gayatri Datar: अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar ) 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अभिनेते सुबोध भावेंबरोबर स्क्रीन शेअर केली होती. ही मालिका संपल्यावर गायत्री 'डान्सिंग क्वीन' आणि अलीकडेच 'अबीर गुलाल'मध्ये झळकली. विशेष म्हणजे गायत्री दातार 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिच्या खेळामुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली. आता गायत्रीने हिंदी 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गायत्री दातार हिनं नुकतंच 'अल्ट्रा मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी गायत्रीनं 'बिग बॉस' हिंदीत जाण्याची इच्छा सांगितली. तसेच 'बिग बॉस' मराठीमुळे तिच्या आयुष्यात काय बदल झाला, याबद्दलही तिनं सांगितलं. गायत्री म्हणाली, "बिग बॉसमध्ये जाण्यापुर्वी मी कधीच ते पाहिलं नव्हतं. त्यामुळे मी जशी आहे, तशीच बिग बॉसमध्ये वागले. बिग बॉसच्या आधी मला आर्थिकदृष्ट्या काही अडचणी आल्या नव्हत्या. पण येईल ते काम मी करीत होते. कारण, पुढे काम नाही आलं तर आणि घराचं भाडं, पैशांची बचत या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे बिग बॉसच्या आधी माझ्याकडे काही पर्याय नव्हते".
पुढे ती म्हणाली, "बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण, मला वाटलं की, जे काही मानधन मला त्यातून मिळेल, त्यामुळे कुठेतरी आर्थिक स्थिरता येईल. त्यामुळे जरी मी जिंकले नाही, तरी माझ्याकडे काम निवडण्यासाठी पर्याय असतील. मला वेगवेगळ्या ऑडिशन देता येतील. मला काही वर्कशॉप करायचे होते. कारण, मला काम करताना कळायचं की, हे मला येत नाहीये किंवा हे अजून चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं. पण, सतत पैसे कमावण्यासाठी काम करत राहावं लागतं आणि या सगळ्यात मला ते नाही करता आलं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करता, मला असं वाटलं की बिग बॉसमध्ये जाणं हा माझ्यासाठी योग्य निर्णय आहे".
गायत्री म्हणाली, "तो निर्णय खरंच योग्य ठरला. कारण, त्यातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर मी वर्कशॉप केलं. छान छान ऑडिशन्स दिल्या, काही कथा वाचल्या, काही लिहिल्या आणि त्यानंतर मला थांबता आलं. कलाकार म्हणून स्वत:ची स्वत: आर्थिक स्थिरता तुम्हाला आणावी लागते", असं तिनं म्हटलं. गायत्रीच्या या वक्तव्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. खरोखरच 'हिंदी बिग बॉस'च्या घरात जाण्याची तिची ईच्छा पुर्ण होणार का, हे पाहणं आता मनोरंजक ठरणार आहे.