कलर्स मराठीच्या सर्व नायिकांनी साजरी केली वटपौर्णिमा, सावित्रींनी व्यक्त केली 'ही' इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:07 IST2024-06-21T13:06:58+5:302024-06-21T13:07:38+5:30
आज वटपौर्णिमा असून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सर्व सावित्री एकत्र आल्या आहेत.

कलर्स मराठीच्या सर्व नायिकांनी साजरी केली वटपौर्णिमा, सावित्रींनी व्यक्त केली 'ही' इच्छा
कलर्स मराठी वाहिनीवरील सर्व नायिका आज एकत्र आल्या आहेत. कारणही खास आहे. आज वटपौर्णिमा असून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सर्व सावित्री एकत्र आल्या आहेत. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर वटपौर्णिमाचा खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सर्व नायिका नटून थटून आल्या असून वडाच्या झाडाच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहेत आणि आपल्या इच्छा सांगत आहेत.
'इंद्रायणी' या मालिकेमधून शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय, तर झाडामागून 'अंतरपाट' मालिकेतील गौतमी हातात धागा घेऊन क्षितिजसोबत सुरु होणाऱ्या नव्या संसाराचे सुख मागत आहे. दुसरीकडे 'अबीर गुलाल'मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत असून 'रमा -राघव' मालिकेतील रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म राहू देत असे म्हणत आहे. 'पिरतीचा वनवा उरी पेटला ' या मालिकेतून सावी अर्जुनची साथ मागत आहे. तर,'सुख कळले' या मालिकेतून मिथिला तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत आहे.
कलर्स मराठीच्या प्रत्येक मालिकेत सध्या वटपौर्णिमेचा खास ट्रॅक सुरु आहे. 'इंद्रायणी' या मालिकेत तुम्ही पाहू शकता की , वटपौर्णिमेच्या शुभदिनी शकुंतला पूजेसाठी इंदूला घेऊन जाते. आनंदी या समारंभात इंदूच्या उपस्थितीवर आक्षेप घेते. परंतु झाडाजवळ साप दिसल्यावर इंदू धैर्याने अधूला जवळ घेत त्याचे सापापासून रक्षण करते. तेच 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेत आपल्याला दिसतंय की , एकीकडे सावी अर्जुनसाठी वटपौर्णिमेची पूजा करत असून बाच्याला सावीबद्दल भावना निर्माण होत आहेत. 'सुख कळले' या मालिकेत माधव मिथिलाला वचन देतो की, वटपौर्णिमेपर्यंत तो बँकेच्या फसवणुकीमागील खरा गुन्हेगार कोण आहे, हे शोधून काढणार आहे.