"मी खेळत होतो, भांडतही होतो, पण त्यांनी दाखवलं नाही...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच करण सोनावणेचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:28 IST2026-02-20T15:28:09+5:302026-02-20T15:28:38+5:30
'बिग बॉस मराठी ६'मधून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली होती. करणच्या एक्झिटने त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. बिग बॉसच्या घराबाहेर येताच आता करणने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

"मी खेळत होतो, भांडतही होतो, पण त्यांनी दाखवलं नाही...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच करण सोनावणेचा मोठा गौप्यस्फोट
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मधून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली होती. करणच्या एक्झिटने त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. बिग बॉसच्या घरात माइंड गेम करूनही घराबाहेर पडल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते. बिग बॉसच्या घराबाहेर येताच आता करणने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी बिग बॉसच्या घरात खेळत होतो, भांडत होतो पण त्यांनी दाखवलं नाही असं करणने म्हटलं आहे.
करणने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर युट्यूब लाइव्हमधून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्याने उत्तरं दिली. या लाअव्हमध्ये त्याने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टी सांगितल्या. करण म्हणाला, "आम्ही फक्त तुझ्यासाठी बिग बॉस बघत होतो, असं काही लोक म्हणत होते. तू आम्हाला भांडताना दिसशील, आम्हाला एंटरटेन करशील, तुझी एक वेगळी बाजू दिसेल. हे सगळं मी केलं. पण ते दाखवलं गेलं नाही. आणि ते का दाखवलं गेलं नाही हे तुम्ही बिग बॉसलाच विचारू शकता. मला त्याबद्दल कोणतीही तक्रार करायची नाही".
पुढे तो म्हणाला, "खूप लोकांना असं वाटतंय की मी खेळलोच नाही. पण असं विचित्र खेळणं माझ्या पर्सनालिटीच्या विरुद्ध जाऊन मला करावं लागलं असतं. आणि मग तुम्ही म्हणाले असता की हा करण तो नाहीये. मला बाहेर आल्यानंतर खूप लोकांनी असं सांगितलं की शेवटचे दोन आठवडे मी दिसलोच नाही. तर मी मुद्द्यांमध्ये बोलत होतो, माझी भांडणंही होत होती. बाल्कनीमध्ये बसणं हे पहिल्या आठवड्यानंतरच कमी केलेलं. रितेश भाऊंनी सांगितल्यानंतर मी आणि प्राजक्ताने हे ठरवलेलं की बाल्कनीत फक्त सकाळी आणि रात्री लाइट्स ऑफ झाल्यावर जायचं. बाकी पूर्ण वेळ आपण खाली असलं पाहिजे. कारण तिथे मुद्दे असतात".
"तुम्हाला वाटत असेल की माझा गेम नव्हता. पण घरातल्या लोकांनाही माहित होतं की माझा गेम आहे. तन्वी माझ्या एलिमिनेशननंतर पण बोलली की तो आतून एक गेम खेळत होता आणि मला तो जायला हवा होता. सगळ्यांना माहीत होतं की गेम चालू होता. पण मला ओपन अप व्हायला थोडा वेळ लागत होता. घरातल्या लोकांना हे कळून चुकलेलं की करण काहीतरी गेम करतोय. पण ते आपल्याला कळत नाहीये. त्यामुळे ते घाबरून होते", असंही त्याने सांगितलं.