भगरे गुरुजींना लाडक्या लेकीसाठी हवा आहे 'असा' जावई, म्हणाले "एक पिता म्हणून वाटतं की तिला एक उत्तम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:08 IST2025-06-15T12:08:12+5:302025-06-15T12:08:25+5:30
अनघा अतुलच्या लग्नावर वडिलांची प्रतिक्रिया: "मुलीने आता लग्न करावं", जावई कसा हवा यावर म्हणाले...

भगरे गुरुजींना लाडक्या लेकीसाठी हवा आहे 'असा' जावई, म्हणाले "एक पिता म्हणून वाटतं की तिला एक उत्तम..."
'रंग माझा वेगळा' या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा अतुल ()Anagha Atul) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. चाहतेदेखील तिच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अनघा ही ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे यांची मुलगी आहे. 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या मालिकांमुळे भगरे गुरुजींना महाराष्ट्रातील घराघरांत ओळखलं जातं. भगरे गुरुजींचा त्याच्या लाडक्या लेकीवर प्रचंड जीव आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनघाच्या लग्नाबाबत भाष्य केलं.
'फादर्स डे'च्या निमित्ताने भगरे गुरुजी आणि अनघा या बाप लेकीच्या गोड जोडीनं 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या खास संवादात, भगरे गुरुजींनी आपल्या मुलीच्या लग्नाबाबत उघडपणे मत व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं, "आता तीने लग्न करावं, असं मला वाटतं". ते म्हणाले, "तिच्या क्षेत्रात पुढे जातेय, हे मला आवडतं. प्रत्येकवेळी तिला कोणतं काम मिळालं तर ती याबद्दल आम्हाला सांगते. ती तिच्या मार्गाने व्यवस्थित जातेय. अशाच पद्धतीनं तिची प्रगती होत राहो आणि दुसरा विषय म्हणजे मुलीच्या बाबतीत एक पिता म्हणून वाटतं तिला एक उत्तम जीवनसाथी मिळू देत".
पुढे ते म्हणाले, "मी तिला लग्नामध्येही स्वातंत्र्य दिलं आहे. दोन्ही मुलांना या बाबतीत मी आधीच सांगितलं होतं की, तुम्हाला जो निर्णय घ्यायचाय तो अगदी विचारपूर्वक घ्या. तुमच्या निर्णयाच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे. फक्त पुढे जाऊन कोणत्याही अडचणी येऊ नयेत, म्हणून तुम्ही फार विचार करून निर्णय घ्या. जेणेकरून नंतर पश्चाप करण्याची वेळ येणार नाही".
यावेळी त्यांना 'तुम्हाला कसा जावई हवा आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले, "मला जावई कसा हवाय, यापेक्षा आता तो हवा आहे हे फार महत्त्वाचं आहे. मी तिला त्याही बाबतीत मुभा दिलेली आहे की, तू बघ...तुला जिथे वाटेल की, आपले विचार जुळू शकतात... तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आलेली आम्हालाही चालणार आहे. आम्ही तिला मुभा जरी दिली असली तरी, ती इतकी परंपरा आणि संस्कृतीमध्ये आहे की, प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगते. 'तुम्ही सांगा, तुम्ही निर्णय घ्या' असं तिचं म्हणणं असतं. खरंतर, मलाही आश्चर्य वाटतं, या क्षेत्रात काम करूनही तिचे विचार कायम आमच्याशी जोडलेले आहेत. तिने भावाचा विवाह इतका उत्तम आणि दणक्यात करून दिला की आम्हालाही आश्चर्य वाटलं. आता तिच्या आईला आणि मला तिच्या लग्नाचे वेध लागले आहेत".
याच मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आलं, "तू लग्नाचा विचार केव्हा करणार?" यावर अनघाने उत्तर दिलं की, "२०२६ मध्ये… अरेंज कम लव्ह मॅरेज व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे, जर कोणी आवडलं, तर त्याला वेळ द्यावा, समजून घ्यावं आणि मगच लग्न करावं, हेच माझं मत आहे". दरम्यान, अनघा आणि तिचे वडील अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्यात घट्ट नात असल्याचं पाहायला मिळालंय.
बाबा–मुलीचं नातं किती घट्ट आहे, हे स्पष्ट जाणवतं. वडील म्हणून अतुलशास्त्री भगरे गुरुजींचं आपल्या मुलीबद्दलचं प्रेम, काळजी आणि तिच्यासाठीची स्वप्नं या संवादातून सहज व्यक्त झाली. अनघा उत्तम अभिनेत्री आहेच पण, याचबरोबर ती उद्योजिका सुद्धा आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अनघाने पुण्यातील डेक्कन परिसरात आपल्या भावाच्या साथीने 'वदनी कवळ' हे शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरू केलं.