'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये रंजक वळण, पाहायला मिळणार जानकी-ऋषिकेशची १२ वर्षांपूर्वीची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:00 IST2025-11-03T13:59:17+5:302025-11-03T14:00:54+5:30
Gharoghari Matichya Chuli Serial : 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे जाणार आहे.

'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये रंजक वळण, पाहायला मिळणार जानकी-ऋषिकेशची १२ वर्षांपूर्वीची लव्हस्टोरी
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे जाणार आहे. जानकी-ऋषिकेशच्या संसाराची गोष्ट आपण मालिकेच्या पहिल्या भागापासून पाहत आलो आहे. पण जानकी-ऋषिकेशची भेट नेमकी कशी झाली? पहिली भेट ते लग्न हा प्रवास नेमका कसा होता? या प्रवासात नेमका कसा चढ-उतार होता? याची रंजक गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणार आहे.
सध्या ऋषिकेश-जानकी आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या आयुष्यात ऐश्वर्या आणि मास्कमॅन नावाचं वादळ आहे. बारा वर्षांपूर्वी देखील ऋषिकेश-जानकीच्या प्रेमाच्या गोष्टीत मकरंद नावाचं वादळ होतं. हा मकरंद नेमका कोण? ऋषिकेश-जानकीच्या प्रेमात अडथळे आणण्यामागे त्यांची नेमकी काय योजना होती, याची उत्कंठावर्धक गोष्ट घरोघरी मातीच्या चुलीमध्ये पाहायला मिळणार आहे.
मालिकेतल्या या अनोख्या वळणाबद्दल सांगताना ऋषिकेश म्हणजेच अभिनेता सुमीत पुसावळे म्हणाला, मालिकेतल्या या नव्या कथानकासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आजवर मालिकेत प्रेक्षकांनी शांत, संयमी आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारा ऋषिकेश पाहिला आहे. पण १२ वर्षांपूर्वी ऋषिकेशचा स्वभाव फार वेगळा होता. खूप पैलू आहेत या भूमिकेला. बारा वर्षांपूर्वी जानकी – ऋषिकेश नेमके कसे होते हे साकारताना खूप धमाल येणार आहे. लूकपण खूप छान झाले आहेत. प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक नक्की आवडेल याची खात्री आहे.