"दादा अनंतात विलीन झाले" अश्विनी महागंडेची भावुक पोस्ट, म्हणाली "कामाचा माणूस म्हणजे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:28 IST2026-01-30T15:24:53+5:302026-01-30T15:28:09+5:30
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे.

"दादा अनंतात विलीन झाले" अश्विनी महागंडेची भावुक पोस्ट, म्हणाली "कामाचा माणूस म्हणजे..."
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी मुखाग्नी दिला. पवार कुटुंब, लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी अश्रू ढाळत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर 'अजितदादा अमर रहे' ही एकच हाक होती. यातच 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
अश्विनीने आपल्या पोस्टमध्ये लिहलं, "कशाचा माज करावा माणसाने? सोबतच्या माणसांचा, केलेल्या कामाचा की कमावलेल्या पैशांचा? सगळे इथेच राहणार हे माहीत असूनही कसली धडपड सुरू आहे? कितीही मिळवलं तरी ते कमी पडणारच.. मग नेमकं काय कमवायचं?" या प्रश्नांचे उत्तर देताना तिने तिच्या वडिलांच्या शब्दांचा संदर्भ दिला. तिचे वडील म्हणायचे, "परमात्म्याने तुम्हाला बेस्ट काम करायला इथे पाठवलं आहे, ते झाल्याशिवाय सुटका नाही…".
अजितदादांच्या जाण्याने प्रचंड नैराश्य आल्याचे अश्विनीनं म्हटलं. तिने लिहलं, की, "आता कोणत्याही कामासाठी, माणसांसाठी कसलाही अट्टाहास करावा वाटत नाही, इतकं नैराश्य आलं आहे. कालपासून जीव अगदी दमून गेलाय". अजित पवारांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांना राजकारणात 'कामाचा माणूस' म्हणून ओळखलं जायचे. याचाच संदर्भ घेत अश्विनी म्हणाली, "कामाचा_माणूस म्हणजे परत स्वार्थी झालो का आपण? की माणसाला फक्त माणूसच समजायला हवं होतं? असो... दादा अनंतात विलीन झाले".