"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
By कोमल खांबे | Updated: April 8, 2026 11:35 IST2026-04-08T11:34:25+5:302026-04-08T11:35:20+5:30
"रातोरात लक्ष्य मालिकेतून काढलं...", दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर, म्हणाले- "तो मालिकेत कधीच नव्हता..."

"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
मराठी अभिनेता दिगंबर नाईक यांनी एका मुलाखतीत बोलताना आदेश बांदेकरांनी रात्री पावणे बारा वाजता लक्ष्य मालिकेतून काढून टाकल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आदेश बांदेकरांनी व्हिडीओ शेअर करत खरं काय ते सांगितलं आहे. "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे...सुबुद्धी दे...आनंद दे. नुकतंच मी सोशल मीडियावर बघितलं की लक्ष्य मालिकेवर कुणीतरी विधान केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेत त्या कलावंतांमध्ये जी व्यक्ती कधी नव्हतीच...अनेक भाग लक्ष्य मालिकेचे झाले. जर त्या मालिकेतच नाही तर त्या मालिकेतून काढलं, असं कसं म्हणता येईल?", असं बांदेकरांनी म्हटलं आहे.
पुढे बांदेकरांनी असं म्हटलं की "मालवणी माणसाला मालवणी माणूस नको असं म्हणत असताना हे नम्रपणे सांगावंसं वाटतं की त्या लक्ष्य मालिकेतल्या पाच जणांच्या टीममधील पोलीस कमलेश सावंत हा देवगडचा...मालवणीच. ज्याने आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. आणि आता दृश्यमच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. असे कितीतरी मालवणी आहेत जे इमाने इतबारे रंगदेवतेची सेवा करत आहेत. सोहम प्रोडक्शनची नांदा सौख्यभरे या मालिकेतील ऋतुजा बागवे ही नायिका...ही मालवणीच. त्याच मालिकेतील आजी रागिनी सावंत काय सुंदर मालवणी बोलतात...कारण त्या मालवणीच आहेत. शाब्बास सुनबाईमधल्या शकुंतला ताई नरे यादेखील मालवणीच...यादीच काढायची झाली तर खूप नावं काढता येतील. मालिकेचा निर्माता मीदेखील कुडाळचा मालवणीच आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या मातीला कधीही विसरता येत नाही. त्यामुळे जे केलं ते प्रामाणिकपणे केलं".
दिगंबर नाईक यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही बांदेकरांनी दिला. ते म्हणाले, "लक्ष्य या मालिकेत जवळपास ५ हजाराहून जास्त कलाकारांनी काम केलं. त्यातले कितीतरी मालवणीच आहेत. पण मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण प्रत्येक भागाचा, प्रांताचा आदर केला पाहिजे. मी इतकी वर्ष अत्यंत प्रामाणिकणे, मेहनतीने मनोरंजनाची सेवा करत आहे. त्यामुळे उगाच असं काहीतरी विधान करणं, त्या विधानातून मालवणी माणसाला मालवणी माणूस नको...मला याच्यातून काढलं. मला याने घेतलं नाही. त्याने घेतलं नाही. त्यापेक्षा आपण काम करूया. आपल्या कामाचा ठसा उमटवूया. एक बोट समोरच्याकडे दाखवताना चार बोटं स्वत:कडे असतात. हे कधीच विसरू नये. आत्मपरिक्षण करावं...आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सेवा करावी".
नेमकं काय म्हणाले होते दिगंबर नाईक?
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिगंबर नाईक म्हणाले होते की "मालवणी अभिनेता म्हणून मला आता 'वस्त्रहरण' नाटक केल्यानंतर स्वीकारलं. मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. आदेश बांदेकर..माझा मित्रच आहे तो. मला रात्री पावणे बारा वाजता त्याच्या 'लक्ष्य' या मालिकेतून काढलं. तेव्हा चॅनेल हेडचं मत होतं, हा कॉमेडी करतो, सिरीयस भूमिका कशी करेल. त्यांचं मत असू शकतं, माझा काही विरोध नाही. पण, बांदेकरांना असं नाही वाटलं, मालवणी मुलगा आहे, आपल्या मालिकेत घेऊया. मालवणी मालिकेत मालवणी लोकं नको असतात. मालवणी सिनेमात मालवणी माणसं नको असतात".