Genius Movie Review: ना ‘दिल’, ना ‘दिमाग’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST2018-08-24T13:05:25+5:302023-08-08T19:28:38+5:30
९० च्या दशकातील जुन्या ‘स्कूल स्टाईल’ने बनवलेला एक टुकार चित्रपट इतकेच या चित्रपटाचे वर्णन करता येईल.

Genius Movie Review: ना ‘दिल’, ना ‘दिमाग’!!
- जान्हवी सामंत
एखादा दिग्दर्शक वा निर्माता आपल्या मुलाला एखाद्या टीपिकल चित्रपटातून लॉन्च करणार असेल तर तो चित्रपट कसा असेल? केवळ फायटींग, रोमान्स, डायलॉगबाजी, अॅक्शन आणि बुद्धीला न पटणारे अनेक सीन्स. मुलाला लॉन्च करणे केवळ आणि केवळ हेच त्या दिग्दर्शक वा निर्मात्याचे ध्येय असते. आपल्या मुलातील असली-नसली सगळी प्रतिभा पडद्यावर उगाळणे हाच प्रयत्न असतो. ‘जीनिअस- दिल की लडाई दिमाग से’ हा चित्रपटही याच पठडीतला आहे. दिग्दर्शक अनिल शर्माने आपला सुपूत्र उत्कर्ष शर्माला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी बनवलेला हा चित्रपट. पण दुर्दैवाने हा चित्रपट ना ‘दिल’ला स्पर्श करत, ना ‘दिमाग’ला पटत.
एक जीनिअस देशप्रेमी आयआयटी इंजिनिअर वासूदेव शास्त्री उर्फ वासू (उत्कर्ष शर्मा) याची ही कथा. मथुरेत राहणारा हा आयटी एक्सपर्ट वासू आयआयटीला प्रवेश घेतो आणि इंजिनिअरिंग सुरू होताच एकदम रॉसाठी वेबसाईट हॅक करू लागतो. आयआयटी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तो नंदिताच्या (इशिता चौहान) प्रेमात (अगदी कारण नसताना) पडतो़ आयआयटीमध्ये शिक्षण घेत असतानाच आधुनिक विज्ञानावर झालेल्या वेद उपनिषदांच्या प्रभावांचा प्रचार करण्याचे काम तो करतो. आपल्या देशाचा, संस्कृतीचा, धर्माचा आणि स्वत:च्याच ‘जीनिअस’पणाचा त्याचा प्रचारही सुरु असतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो राष्ट्रीय सुरक्षा संस्थेत रूजू होतो आणि एका मिशनवर असताना जखमी होतो़ पण त्याचे देशप्रेम मात्र तसूभरही कमी होत नाही. या मिशनमागे दुसरा देशद्रोही जीनिअर एमआरएस (नवाजुद्दीन सिद्दीकी)चा हात असल्याचे त्याला कळते. मग जखमी अवस्थेतला वासू आपल्या प्रेमाचा आधार घेत एमआरएसचे मथुरेतील कृष्ण मंदिरांना ध्वस्त करण्याचे मनसुबे हाणून पाडतो.
खरे तर चित्रपट सुरू होऊन २० मिनिटं होत नाही तोच, या चित्रपटात कुणीच ‘जीनिअस’ नाही हे कळून चुकते. ९० च्या दशकातील जुन्या ‘स्कूल स्टाईल’ने बनवलेला एक टुकार चित्रपट इतकेच या चित्रपटाचे वर्णन करता येईल. अतिशय सुमार कथा आणि तितकेच सुमार दिग्दर्शन असल्यामुळे चित्रपट तथ्यहिन वाटतो.
अगदी चित्रपटातील काही त्रूटींवर बोट ठेवण्याच्या योग्यतेचाही हा सिनेमा नाही. खरे तर अनिल शर्मा यांनी मुलाच्या डेब्यूसाठी ही स्क्रिप्ट का निवडावी, हाच प्रश्न आहे. याऐवजी अन्य कुठल्या स्क्रिप्टमध्ये उत्कर्ष कदाचित चमकला असता. पण या स्क्रिप्टमुळे उत्कर्षचा डेब्यू चांगलाच फसलायं, इतके नक्की.