ख्रिसमस पार्टीतील 'तो' प्रसंग अन् कतरिना-रणबीरचं झालं ब्रेकअप, काय घडलं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:47 IST2026-02-05T12:44:12+5:302026-02-05T12:47:55+5:30
कपूर घराण्याची सून होता होता राहिली कतरिना; कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत नेमकं काय घडलं होतं?

ख्रिसमस पार्टीतील 'तो' प्रसंग अन् कतरिना-रणबीरचं झालं ब्रेकअप, काय घडलं होतं?
संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता विकी कौशल सारखे तीन पॉवरहाऊस कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात विशेषतः विकी आणि रणबीर यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, या चित्रपटाच्या कास्टिंगमुळे एका जुन्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. ते म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचं नातं.
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी एकमेकांना जवळपास सहा वर्षे डेट केले होते. त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचेल असे वाटत असतानाच त्यांचा ब्रेकअप झाला. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या या जोडीचा ब्रेकअप चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. आज रणबीर आणि कतरिना हे दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले असले तरी, त्यांच्या अधुऱ्या प्रेमाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये होताना दिसते.
रणबीर आणि कतरिना यांची 'अजब प्रेम की गजब कहानी' या सिनेमाच्या सेटवर चांगली मैत्री झाली. तिथूनच त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. कतरिनाआधी रणबीर दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तर कतरिना सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. असं म्हटलं जातं की, रणबीरच्या आयुष्यात कतरिना आल्यामुळेच त्याचं दीपिका पादुकोणसोबतचं नातं संपुष्टात आलं. चाहत्यांना रणबीर-कतरिनाची जोडी इतकी आवडली होती की, अनेकांनी त्यांच्या लग्नाची स्वप्नंही पाहिली होती. पण, ते स्वप्न पुर्ण झालं नाही.
या दोघांच्या ब्रेकअपचं सर्वात महत्त्वाचं कारण रणबीरची आई नितू कपूर यांची नाराजी असल्याचं सांगितलं जातं. कतरिनासोबतच्या नात्याला नितू कपूर यांचा कडाडून विरोध होता. एकदा कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला रणबीर आणि कतरिना एकत्र पोहोचले होते. कतरिनाला तिथे पाहून नितू कपूर इतक्या संतापल्या की, त्या तो कार्यक्रम सोडून निघून गेल्या. कुटुंबाची हीच नाराजी आणि आईचा विरोध यामुळे अखेर या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला, अशा चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगतात. आज दोघांचा आप-आपला सुखाचा संसार सुरू आहे. कतरिनाने विकी कौशलसोबत २०२१ मध्ये लग्न केले. त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिल्या मुलाचं स्वागत केलं. तर रणबीर कपूरने ५ वर्ष डेटिंग केल्यानंतर २०२२ मध्ये आलिया भटशी लग्न केले. त्यांना 'राहा' नावाची एक मुलगी आहे.