मृत्यूशी लढत होती 'ही' सेलिब्रिटी; मध्यरात्री गोविंदाने नोटांनी भरलेली बॅग दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 02:31 PM2023-02-27T14:31:13+5:302023-02-27T14:34:57+5:30

आपल्या अभिनयाने आणि डान्सने लोकांच्या मनात घर करणाऱ्या सुपरस्टार गोविंदाची फॅन फॉलोईंग आजही कमी नाही. तो केवळ एक चांगला अभिनेता किंवा डान्सरच नाही तर एक उत्तम माणूस देखील आहे असं कौतुक आम्ही नाही तर त्याचे डान्स गुरू सांगत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान गोविंदाबद्दल बोलताना दिसत आहे. चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी गोविंदा सरोज खान यांच्याकडून डान्स शिकत असे. मात्र त्यावेळी त्याच्याकडे फीचेदेखील पैसे नव्हते.

एका मुलाखतीत सरोज खानने गोविंदाबद्दल बोलताना सांगितले की, गोविंदा केवळ एक चांगला अभिनेता आणि डान्सर नाही तर मोठ्या मनाचा माणूसही आहे. 'गोविंदा मला म्हणाला होता, मास्टर जी, मी विरारहून इथे तिकिटशिवाय येतो. माझ्याकडे पैसे नाहीत. मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही.

तेव्हा मी म्हटलं, मी मागितले? जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मागेन त्यावर तो म्हणाला- हो चालेल. काळ निघून गेला. मी पुन्हा डोला रे डोला हे गाणे करत होते त्यावेळी मी आजारी पडले. तेव्हा डॉक्टरांनीही मी जगू शकत नसल्याचे सांगितले होते असा खुलासा सरोज यांनी मुलाखतीत केला.

मी जीवन-मरणाशी संघर्ष करत होते. त्यावेळी रात्री २-२.३० वाजता गोविंदा हॉस्पिटलमध्ये आला, तिथे माझ्या मोठ्या मुलीच्या हातात पार्सल दिले. जिचे आता निधन झाले आहे. त्याने मुलीला सांगितलं, मास्टरजींचा मुलगा आलेला आणि तो निघून गेला.

जेव्हा मी पॅकेट उघडले तेव्हा त्यात ४ लाख रुपये होते. आता मी गुरुदक्षिणा देऊ शकतो, असे त्या पाकिटात लिहिले होते. हे संस्कार आहेत अशा शब्दात सरोज खान यांनी अभिनेता गोविंदा बद्दलचा किस्सा शेअर केला आहे.

गोविंदाने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम आणि हिट चित्रपट दिले आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र, एक काळ असा होता की गोविंदाकडे त्याच्या गरजा भागवण्यासाठीही पैसे नव्हते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी गोविंदाने आयुष्यात खूप संघर्ष केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डान्सची आवड पूर्ण करण्यासाठी तो दररोज सुमारे १९ किलोमीटरचा प्रवास करत आणि सरोज खान यांच्याकडून डान्स शिकत असे. गोविंदाने १९८६ मध्ये 'इलजाम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

या चित्रपटानंतर अभिनेता गोविंदाने कधीही मागे वळून पाहिले नाही. 'राजा बाबू', 'हम', 'कुली नंबर 1', 'हीरो नंबर 1', 'पार्टनर', 'आँखे', 'साजन चले ससुराल' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले.

पण हळूहळू गोविंदाचे युग संपुष्टात आले. त्यानंतर गोविंदाने राजकारणात पाऊल ठेवले. काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभेची निवडणूक लढवली आणि गोविंदा खासदार म्हणून निवडूनही आला. मात्र त्यानंतर गोविंदाने पुन्हा निवडणूक लढवली नाही.