IIT पदवीधर, अभिनयासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली अन्...; ओटीटी विश्वावर गाजवतोय अधिराज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:41 IST2025-06-27T16:28:10+5:302025-06-27T16:41:02+5:30
IIT पदवीधर, अभिनयासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली अन्...; आता ओटीटी विश्वावर गाजवतोय अधिराज्य

बॉलिवूड इंडस्ट्रीत असेही कलाकार आहेत ज्यांची अभिनयाची कोणताही पार्श्वभूमी नसताना आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक कलाकर इंडस्ट्रीत आउटसाईडर असूनही यशस्वी झाले. असाच एक अभिनेता ज्याने आयआयटी खरगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊनही अभिनयाची वाट धरली. हा अभिनेता म्हणजे जितेंद्र कुमार आहे.
सध्या जितेंद्र कुमार 'पंचायत सीझन-४' मुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या लोकप्रिय वेबसिरीजचे पहिले तिन्ही सीझन गाजले. फुलेरा गाव, त्यातील गावरकरी आणि सचिवजीची गोष्ट प्रेक्षकांना भावली आहे. या सीझनमधील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं.
जितेंद्र कुमारचा जन्म हा १ सप्टेंबर १९९० मध्ये राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खैरथल गावात झाला. छोट्याश्या गावातून आलेल्या जितेंद्रने आयआयटी खरगपूरमधून डिग्री घेतली.
परंतु अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. अनेकदा तो अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांची मिमिक्री करायचा.
अभ्यासात तो प्रचंड हुशार होता. आयआयटीची पदवी मिळाल्यानंतर बंगळुरूमधील एका जपानी कंपनीत त्याला नोकरी मिळाली. त्यानंतर विश्वजीत सरकार यांनी त्यांना टीव्हीएफसाठी बोलावलं आणि त्याचं नशीबच पालटलं.
टीव्हीएफच्या ‘पंचायत’, ‘कोटा फॅक्टरी’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे.
जितेंद्र कुमार आता OTT चा सुपरस्टार झाला आहे. त्याने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत.