एकेकाळी चाळीत राहून काढले दिवस अन्...; भांडुपची 'ही' मुलगी गाजवतेय मराठी मालिकाविश्व, ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:43 IST2025-06-17T16:27:21+5:302025-06-17T16:43:56+5:30
अभिनयाच्या चंदेरी दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं कठीण आहे. त्यासाठी स्ट्रगल कोणाला चुकलेला नाही.

अनेकांनी अपार कष्ट करत यशाचं शिखर गाठलं आहे. अशीच एक मुंबईतील भांडुपमध्ये राहणारी मुलगी मराठी मालिका रसिकांच्या मनात जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ही अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.
वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून अभिनेत्री रुचिरा जाधव प्रसिद्धीझोतात आली.
'माझ्या नवऱ्याची बायको', '३६ गुणी जोडी', यांसारख्या मालिकांमधून रुचिरा घराघरात पोहोचली.
तसंच 'बिग बॉस' मराठीच्या तिसऱ्या पर्वातही ती झळकली आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
दरम्यान, मुंबईतील भांडुपमधील लहानाची मोठी झालेली रुचिरा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.
नुकत्याच 'सुमन म्युझिक पॉडकास्ट'ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या बालपणाविषयीचे खास किस्से शेअर केले आहेत. त्याबद्दल बोलताना तिने म्हटलं, "सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी मला पाहून लोकांना असं वाटतं की ही अशी असेल, तशी असेल. पण माझ्या जवळच्या माणसांनाच माझ्याबद्दल खरी माहिती आहे."
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली,"हो, हे खरं आहे. माझं बालपण चाळीत गेलं. माझे बाबा पोस्टात होते. दहावीपर्यंत मी चाळीत राहात होते. आई एक गृहिणी आहे. पण, तिने माझ्या बाबांना सपोर्ट करण्यासाठी स्वत चा एक गृहउद्योग सुरु केला. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण, मला जे-जे पाहिजे होतं, त्या गोष्टी माझ्या बाबांनी मला दिल्या.आता ते ज्या गोष्टीवर बोट ठेवतील त्या गोष्टी मी त्यांना देणार. त्या चाळीतल्या जीवनाचं मला वाईट वाटत नाही." असा खुलासा अभिनेत्री केला.