'ट्रोलर्सचे आईवडील आधीच वर गेले...' म्हातारे म्हणून हिणवणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 02:01 PM2023-10-22T14:01:05+5:302023-10-22T14:09:08+5:30

आम्ही इतकी वर्ष काम करतोय पण....

मराठीतील ज्येष्ठ कपल अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar)दोघंही सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत असतात. इन्स्टाग्रामवरील ट्रेंडिंग रील्सवर ते मजेशीर व्हिडिओ बनवत असतात.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या दोघं आजही काम करत आहेत. मालिकांमध्ये भूमिका साकारत आहेत. सोबतच त्यांच्या फिटनेसचं सगळेच कौतुक करतात. कित्येकदा त्यांचे योगा करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

मात्र रील्समध्ये विचित्र हावभाव केल्याने गेल्या काही दिवसांपासून अविनाश नारकर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. म्हातारचाळे लागले म्हणत सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे.

मध्यंतरी 'बादल बरसा बिजुली..' या ट्रेंडिंग गाण्यावरही त्यांनी ठेका धरला. इथपर्यंत ठीक होतं पण मध्यंतरी व्हायरल झालेलं 'आमच्या पप्पांनी गंमती आणला' या गाण्यावरही दोघांनी डान्स केला. यामध्ये अविनाश नारकर यांचे हावभाव नेटकऱ्यांच्या पचनी पडले नाहीत आणि त्यांना चांगलेच खडेबोल ऐकावे लागले. शेवटी हे रील त्यांनी अकाऊंवरुन डिलीट केलं.

एकीकडे फिटनेसमुळे होणारं कौतुक मात्र दुसरीकडे असे रील्स बनवल्याने ही या जोडीवर चांगलीच टीका होत आहे. आता या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर यांनी अगदी तिखट शब्दात उत्तर दिलं आहे. 'इट्स मज्जा' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या नारकर रोखठोक बोलल्या आहेत .

त्या म्हणाल्या,'मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी केला पाहिजे. जेव्हा मी काहीही पोस्ट करते मग अगदी रील्स पोस्ट करते त्याच्याखालचं कॅप्शन कोणीच वाचत नाही. जे मला म्हणायचंय ते मी त्यात लिहिलेलं असतं.'

'आम्ही आमच्या नात्याविषयी बोलतो, शेअर करतो. आजकाल जे हे ट्रोल करताता त्यांची नाती किती घट्ट आहेत काय आहेत हे आपल्याला सध्याच्या पिढीचं माहितच आहे. पण आम्ही इतकी वर्ष एकमेकांबरोबर आनंदाने राहतोय त्यानिमित्ताने आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो.'

दुसरी गोष्ट म्हणजे आपण आदर ठेवला पाहिजे. सोशल मीडियावर तुम्हाला न आवडलेल्या गोष्टी तुम्ही बघू नका अनफॉलो करा. मलाही ब्लॉक करता येतं. पण मला असं होतं की का आपण माणूस म्हणून एकमेकांचा आदर करु शकत नाही? नाही आवडलंय तर चांगल्या शब्दात नाही आवडलं एवढं म्हणूच शकतो.'

रील्समुळे पैसे मिळतात असाही मुद्दा मी वाचला. असं नाहीए मलाही सांगा अशी काय स्कीम आहे का. माणूस प्रत्येक गोष्ट पैशांसाठी नाही करत. आम्ही १२ -१२ तास काम करुन पैसे कमावतो. ते आमचं पॅशन आहे.त्यासाठी बाकी गोष्टी करण्याचं कारण नाहीए. इतकं उथळ विचारांनी नका वागू.

आपण मुलांना कसे संस्कार देतो यात आईवडिलांचा खूप सहभाग आहे. आपली मुलं कोणाला काय बोलतात हे संस्कार घरातच होत असतात. त्यामुळे असे जे विकृत बोलतात त्यांच्या घरातल्या वातावरणावर मला शंका येते की त्यांच्यावर आईवडिलांनी संस्कार केले की नाही केले की त्यांचे आईवडील आमच्यासारखे म्हातारे होण्याच्या आधीच वर गेले असे सगळेच प्रश्न अनुत्तरित राहतात.'