कंगना राणौतची शिवभक्ती! भीमशंकरच्या दर्शनाने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा; १० वर्षांचा संकल्प तडीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:38 IST2025-12-29T12:12:12+5:302025-12-29T12:38:02+5:30

Kangana Ranaut Completed 12 Jyotirlingas Journey : "१० वर्षांचा प्रवास अन् १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण", कंगना राणौत शिवभक्तीत तल्लीन

बॉलिवूडची 'क्वीन' आणि भाजप खासदार कंगना राणौत ही महादेवाची मोठी भक्त आहे.

कंगनाने नुकतेच महाराष्ट्रातील भीमशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि याचसोबत तिचा भारतातील सर्व १२ ज्योतिर्लिंगांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, "महादेव आणि माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्मांच्या कृपेने आज मी सर्व १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले. शेवटचे दर्शन भीमाशंकर येथे झाले. हा प्रवास दहा वर्षांहून अधिक काळाचा होता. सुरुवातीला हे सगळे प्रवास योगायोगाने घडत गेले, पण अलीकडेच मी जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि सर्व १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करण्याचा संकल्प केला".

कंगनाने भीमशंकरमधील पूजेचे फोटो शेअर करताना या मंदिराचे विशेष महत्त्व सांगितले. ती म्हणाली, "माझ्यासाठी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेले भीमाशंकर विशेष आहे. कारण हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे शिव आणि शक्ती दोघेही एकाच लिंगामध्ये अर्धनारीश्वर स्वरूपात प्रतिष्ठित आहेत. दिवसभरातील बहुतांश वेळ हे प्राचीन लिंग चांदीच्या आवरणाने झाकलेले असते आणि आतल्या लिंगाचे दर्शन फक्त साधारण १० मिनिटांसाठीच होते. मला त्या वेळेत दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभलं. हर हर महादेव".

यावेळी कंगना अतिशय साध्या पण सुंदर अवतारात दिसली. तिने पिवळ्या रंगाचा सूट आणि हिरवा दुपट्टा परिधान केला होता.

कंगनाच्या कपाळावर छोटी बिंदी, केसांचा अंबाडा आणि महादेवाची भक्ती अशा रूपात ती शिवभक्तीत तल्लीन दिसली.

कंगना मंदिरात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मंदिर परिसरात पर्यटकांची मोठी संख्या होती.

आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत गर्दीवर नियंत्रण मिळवले.

कंगनाने अलीकडेच वैद्यनाथ, ओंकारेश्वर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचे सलग दर्शन घेतले. भीमशंकर हे तिच्या या यात्रेतील शेवटचे स्थान ठरले.

भारतामध्ये मुख्यतः एकूण १२ ज्योतिर्लिंगांमध्ये महादेव विराजमान आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे नाव आणि त्याचे महत्त्व वेगवेगळे आहे. शिवपुराणानुसार, जो व्यक्ती सर्व १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन करतो, त्याला मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते.