बाल्कनीतून तोल गेला की कोणी ढकललं? ५व्या मजल्यावरुन पडली अन्...; बॉलिवूडला हादरवणारी दिव्या भारतीची Death स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 16:16 IST2026-04-05T16:08:06+5:302026-04-05T16:16:36+5:30

दिव्या भारतीच्या मृत्यूचा गुंता इतक्या वर्षांनंतरही सुटलेला नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती.

दिव्या भारती ही बॉलिवूडमधली अतिशय लोकप्रिय अभिनेत्री. कमी वयात आणि कमी काळात तिने प्रसिद्धी मिळवली. पण तिचा मृत्यू चाहत्यांना चटका लावून गेला.

वयाच्या १६व्या वर्षी दिव्या भारतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दिवाना, दिल आशना है, जुडवा, दिल का क्या कसूर, शोले और शबनम अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये ती दिसली.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच दिव्या भारती यशाच्या शिखरावर पोहोचली होती. अवघ्या १६व्या वर्षी तिला प्रचंड स्टारडम मिळालं. तिच्या सौंदर्याचे चाहते वेडे होते.

यशाच्या शिखरावर असतानाच दिव्या भारतीने निर्माता साजिद नाडियावाला यांच्यासोबत लग्न केलं. मात्र लग्नानंतर एका वर्षातच तिचा दुर्देवी मृत्यू झाला.

५ एप्रिल १९९३ रोजी राहत्या घराच्या बाल्कनीतून पडून दिव्याचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती.

दिव्याच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.

मात्र दिव्याला बाल्कनीतून कोणीतरी ढकललं, त्यामुळे ती ५व्या मजल्यावरुन खाली पडली आणि मृत्यू झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

दिव्याच्या मृत्यूनंतर गुड्डी मारुती यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या, "दिव्याला कोणीतरी धक्का दिला, अशा अनेक अफवा पसरल्या होत्या. पण, जेव्हा हा अपघात घडला तेव्हा नीता लुल्ला तिथेच होती. तिने सगळं काही पाहिलं".

"ती सोफ्यावर बसली होती आणि पाठीमागे खिडकी होती. बोलता बोलता तिने मागे वळून पाहिलं. दिव्या म्हणत होती की मला वाटतंय साजिदची गाडी आली. ते पाहण्यासाठी ती आणखी खाली वाकली आणि तिचा तोल गेला", असं गुड्डी मारूती म्हणाल्या होत्या.

पण, दिव्या भारतीच्या मृत्यूचा गुंता इतक्या वर्षांनंतरही सुटलेला नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती.