साधुग्राम वृक्षतोडीवरून लेखक अरविंद जगताप यांनी सरकारला सुनावले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:34 IST2025-12-01T13:33:08+5:302025-12-01T13:34:09+5:30
तपोवन वृक्षतोडीवर नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी तसेच सिनेसृष्टीतील काहींनी संताप व्यक्त करत विरोध दर्शवला आहे.

साधुग्राम वृक्षतोडीवरून लेखक अरविंद जगताप यांनी सरकारला सुनावले, म्हणाले...
Arvind Jagtap on Nashik tree Cutting : नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. लोकप्रिय लेखक, पटकथा लेखक अरविंद जगताप यांनीही या वृक्षतोडीविरोधात भूमिका घेतली आहे.
अरविंद जगताप अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय-सामाजिक परिस्थितीवर परखड भाष्य करतात. आता त्यांनी वृक्षतोडीविरोधात फेसबुकवर पोस्ट शेअर करत सरकारला टोला लगावला आहे. त्यात त्यांनी लिहलं, "एक एक मोठं झाडं तोडून दहा दहा नवी रोपं लावायची असतील, तर मग एक एक मोठा मंत्री काढून त्याजागी दहा दहा पीए ठेवले तरी काय हरकत आहे?" या मोजक्याच शब्दात त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. अरविंद जगताप यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
प्रदूषित हवा असलेल्या देशातील टॉप २५ शहरांत नाशिकचा समावेश आहे. म्हणजेच या वृक्षतोडीचा पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्षतोडीला विरोध होतोय. याचा विरोध करण्यासाठी नाशिकमधील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, साहित्यिक रस्त्यावर उतरले असून तपोवनात या झाडांचा आवाज बनून वृक्षप्रेमी सरसावले आहेत. या आंदोलनात वृक्षप्रेमी व अभिनेते सयाजी शिंदे उतरले आहेत. दरम्यान, दर बारा वर्षानी नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. यंदा तो २०२७ मध्ये होईल. सिंहस्थ कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असा दोन ठिकाणी विभागून होतो. त्र्यंबकेश्वरला १० शैव आखाडे सहभागी होतात. या आखाड्यांकडे बऱ्यापैकी स्वमालकीची जागा आहे. नाशिक शहरात तीन वैष्णव आखाडे व त्यांचे सातशे आठशे खालसे राहतात. त्यांच्यासाठी साधुग्राम उभारले जाते.