पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे 'एप्रिल मे ९९' सिनेमातील 'मन जाई' गाणं प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:03 IST2025-05-05T13:03:11+5:302025-05-05T13:03:35+5:30
April May 99 Movie : उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे 'एप्रिल मे ९९' सिनेमातील 'मन जाई' गाणं प्रदर्शित
उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट (April May 99 Movie) येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालपणातील आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असतानाच नुकतेच या चित्रपटातील एक गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे. 'मन जाई' असे बोल असणाऱ्या या गाण्याला सोनू निगम यांचा सुरेल आवाज लाभला असून प्रशांत मडपुवार, रोहन प्रधान यांनी शब्दबद्ध केले आहे. तर रोहन -रोहन यांच्या संगीताने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.
कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची जाईशी होणारी घट्ट मैत्री यात दाखवण्यात आली आहे. निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, "‘एप्रिल मे ९९’ हा एक चित्रपट नाही तर ९० च्या दशकातील प्रत्येकाच्या बालपणाची नाजूक आठवण आहे. आम्ही प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आयुष्यातील गोड क्षण पुन्हा अनुभवता यावेत. प्रदर्शित झालेले गाणे हे त्या बालमैत्रीचे आणि नकळत्या वयातील भावनांचे प्रतिबिंब आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना आपल्या बालमित्रांची आठवणी नक्की येईल."
दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात," या गाण्यातून आम्ही त्या निष्पाप भावनांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या वयात मैत्री आणि प्रेम यामधील रेषा फारच धूसर असतात. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई यांची मैत्री आणि त्यातून नकळत फुलणारी भावना ही प्रत्येकाने अनुभवलेली असते. या गाण्यातून प्रेक्षकवर्ग त्यांचे स्वतःचे बालपण नक्कीच अनुभवतील. ९० व्या दशकाची ही गोड सफर प्रेक्षकांना नक्की आवडेल."
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.