'तुमची उणीव कायम भासत राहील..', सुबोध भावेने उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:07 IST2026-01-28T11:06:27+5:302026-01-28T11:07:17+5:30
छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांचं लक्ष..., सुबोध भावेची भावुक पोस्ट

'तुमची उणीव कायम भासत राहील..', सुबोध भावेने उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे बारामती येथे सभेसाठी जात होते. विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि विमान थेट बारामतीतजवळील शेतात कोसळले. त्यांच्यासोबत विमानात आणखी ५ जण होते. सर्वांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अभिनेता सुबोध भावेने पोस्ट शेअर करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो पोस्ट करत लिहिले, "अजित दादा, महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्ही एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतात. तुम्ही खूप आवडायचा. तुमची काम करण्याची पद्धत, तुमचा हजरजबाबीपणा, सर्वसामान्य माणसाशी थेट त्याच्या भाषेत संवाद साधण्याची पद्धत, छोट्या छोट्या गोष्टींमधे तुमचं असलेलं लक्ष... तुमची उणीव कायम भासत राहील दादा..तुमच्याशी झालेल्या भेटी कायम स्मरणात राहतील. तुम्ही कायम आठवत राहाल दादा."
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक भावना व्यक्त करत आहेत. संगीतकार सलील कुलकर्णी यांनीही 'विश्वासच बसत नाही' अशी पोस्ट केली आहे. कला क्षेत्राशी अजित पवारांचं जवळचं नातं होतं. त्यांचा मिश्कील स्वभाव, शिस्तप्रियता सगळं शिकण्यासारखं होतं.
कसा झाला अपघात?
अपघातावेळी शेतात काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने तो भीषण प्रसंग सांगितला. "विमान विमानतळावर उतरत होते, पण अचानक ते पुन्हा आकाशात वर गेले. हवेतच ते दोन-तीन वेळा गोल फिरले आणि वेगाने खाली कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचे एकामागून एक मोठे स्फोट झाले. विमानाचे लोखंडी भाग आणि अवशेष इतक्या जोरात उडाले की ते आमच्या घराच्या छतापर्यंत येऊन पडले," असे त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत सांगितले.