"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:44 IST2025-09-08T14:43:40+5:302025-09-08T14:44:23+5:30
Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी जवळपास ८ वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी २०११ मध्ये लग्न केले.

"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) हे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. प्रिया आणि उमेश यांची पहिली भेट २००२ मध्ये 'भेट' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झाली होती. त्यानंतर 'आभाळमाया' या मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि जवळपास ८ वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी २०११ मध्ये लग्न केले. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते आणि ते मराठी कलाविश्वातील एक आदर्श जोडपे मानले जाते. आता हे दोघे लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Goshta Movie) सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ते दोघे मुलाखती देत आहेत. एका मुलाखतीत प्रियाने त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला.
२०११ साली प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी थाटामाटात लग्न केलं. पण लग्नाच्या दिवशी प्रिया थोडीशी गोंधळलेली होती. लग्नात कोण आलंय, कोणी जेवलं की नाही, सगळं व्यवस्थित आहे ना असे तिचे सगळे सुरू होते. पण त्यावेळी उमेश कामतने तिला एक छान सल्ला दिला. तारांगणला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा करत सांगितले की, "उमेशने मला एक खूप छान सल्ला दिला होता की 'आता इथे या लग्नाच्या हॉलमध्ये काहीही होवो, कोणाला कमी पडो, कोणी येवो, कोणी न येवो, आग लागो, काय वाट्टेल ते होऊ दे...तुझं लक्ष आणि तुझं मन हे फक्त आणि फक्त आपण दोघे इकडे काय करतो आहोत यातच असू दे!...बाकीची लोक सगळं बघून घेतील....आता तू तुझं मल्टीटास्किंग सोडून दे. कारण हा क्षण आणि हा दिवस पुन्हा आपल्याला साजरा करता येणार नाही.'"
"तर मी लग्नाचे क्षण एन्जॉय करू शकले नसते"
"त्यावेळी माझं असं झालं होतं की कोणाला जेवण मिळालं नाही का, डेकोरेशन झालं नाही का या सगळ्या व्यापातून त्याने मला जर मेंटली शांत करून मोकळं केलं नसतं तर मी माझ्या लग्नाचा एक एक क्षण एन्जॉय करू शकले नसते.", असे पुढे प्रियाने सांगितले.
'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाबद्दल
प्रिया बापट आणि उमेश कामत हे क्युट कपल तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात निवेदिता सराफ आणि गिरीश ओक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.