शरद पोंक्षे यांची गाडी समजून प्रसाद कांबळीच्या गाडीचे केले हल्लेखोरांनी नुकसान, वाचा सविस्तर बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 17:20 IST2020-03-09T17:18:45+5:302020-03-09T17:20:27+5:30
अहमदनगर येथे पत्रकार परिषदेसाठी शरद पोंक्षे गेले असता काही अज्ञान लोकांनी बिल्डींगच्या खाली उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेची तोडफोड केली.

शरद पोंक्षे यांची गाडी समजून प्रसाद कांबळीच्या गाडीचे केले हल्लेखोरांनी नुकसान, वाचा सविस्तर बातमी
शरद पोंक्षे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नाटक, चित्रपट अथवा मालिकेपेक्षा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी पुणे येथील एका कार्यक्रमात केलेल्या विधानाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. या विधानानंतर आता काही लोकांनी शरद पोंक्षे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.
100 वी अखिल भारतीय नाट्य परिषद लवकरच होणार आहे. याची जोरदार तयार सध्या सुरू असून या तयारीसाठी लातूर, अहमदनगर असा दौरा शरद पोंक्षे करत आहेत. शरद पोंक्षे नुकतेच अहमदनगर येथे पत्रकार परिषदेसाठी गेले असता काही अज्ञान लोकांनी बिल्डींगच्या खाली उभ्या असलेल्या एका गाडीच्या काचेची तोडफोड केली आणि हे हल्लेखोर पसार झाले. ही गाडी शरद पोंक्षे यांची असल्याचा समज या हल्लेखोरांचा झाला होता. पण ही गाडी त्यांची नसून नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची आहे.
या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती देताना शरद पोंक्षे यांनी सांगितले की, पत्रकार परिषद पहिल्या मजल्यावर सुरू असताना काही अज्ञान लोकांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत प्रसादच्या गाडीचे नुकसान झाले. आम्हाला कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये. याच गाडीने आम्ही आता मुंबईला परत यायला रवाना झालो आहोत.
पुणे येथील कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी विधान केले होते की, “वीर सावरकर यांचं काम महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा सरस आहे.” या विधानानंतर गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झाला होता. शरद पोंक्षे यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाल्याची भावना बहुजन समाजात पसरली होती. या विधानानंतर सोशल मीडियावर पोंक्षे यांना चांगलेच ट्रोल देखील करण्यात आले होते.