हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:53 IST2025-09-24T12:52:02+5:302025-09-24T12:53:07+5:30
ओल्या सांजवेळी हे गाजलेलं गाणं आता नव्या तालात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'प्रेमाची गोष्ट'च्या सीक्वेलमध्ये हे गाणं आहे.

हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट २०१३ साली आला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. या सिनेमातील ‘ओल्या सांजवेळी’ हे गाणं खूप गाजलं. संगीतप्रेमींच्या ओठांवर गुणगुणलं जाणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित सीक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात ललित प्रभाकर आणि ऋचा वैद्य यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे.
‘ओल्या साजंवेळी’ या गाण्याला काविर आणि बेला शेंडे यांचे मोहक स्वर लाभले आहेत. अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांचे गीत व अविनाश-विश्वजीत यांच्या कमाल संगीताने या गाण्यात रंगत आली आहे. एका नव्या धाटणीचा, तरीही तितकाच गोडवा जपणारा हा संगीत अनुभव प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
संगीतकार अविनाश-विश्वजीत म्हणतात, "चित्रपटाच्या पहिल्या भागातील ‘ओल्या सांजवेळी’ गाण्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. यावेळी आम्हाला त्या गाण्याची तीच भावना आणि गोडवा टिकवून काहीतरी वेगळं, नवं प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न होता. त्यात नव्या पिढीला भावेल असा ताजेपणा आणि तरुणाईचा स्पर्श दिला आहे."
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, " 'ओल्या सांजवेळी’ या गाण्यावर अविनाश–विश्वजीत यांनी अप्रतिम काम केले आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही कथा नवी, तरुणाईला साजेशी आणि ताजेपणाने भरलेली असल्यामुळे त्यांनी गाण्याला दिलेला नवा अंदाज त्याला अधिक उठावदार बनवतो. प्रेक्षकांना पुन्हा एकदा या गाण्यातून प्रेमाची गोड अनुभूती मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे."
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, " इतक्या वर्षांनंतरही या गाण्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या गाण्यातून जुन्या आठवणींना उजाळा तर मिळतोच तसेच नव्या पिढीला जोडणारं हे गाणं आहे."
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात भाऊ कदम, स्वप्नील जोशी, ललित प्रभाकर, ऋचा वैद्य व रिधिमा पंडित हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या २२ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळेल.