"माफ करा, वैयक्तिक घेऊ नका, पण दुर्दैवाने मराठीत एकी नाही"; अभिनेत्यानं मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:56 IST2026-02-04T12:53:07+5:302026-02-04T12:56:23+5:30
लोकप्रिय अभिनेत्यानं शेअर केला कटू अनुभव

"माफ करा, वैयक्तिक घेऊ नका, पण दुर्दैवाने मराठीत एकी नाही"; अभिनेत्यानं मांडलं स्पष्ट मत
वेगवेगळ्या मराठी मालिका, नाटक तसेच चित्रपटांमध्ये विविध धाठणीच्या भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे अशोक शिंदे. त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशोक शिंदे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत 'एकी' नसल्याचे म्हटलंय. एकाच दिवशी अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे थिएटर मिळवताना आणि बॉक्स ऑफिसवर कमाई करताना निर्मात्यांना मोठी कसरत करावी लागते. याच गंभीर विषयावर त्यांनी भाष्य केलंय.
'मराठी मनोरंजन विश्व' या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक शिंदे यांनी "माफ करा. कुणी वैयक्तिक घेऊ नका. पण मराठीत एकी अजून नाही" असं म्हटलं आहे. यावेळी बॉलिवूडमधील उदाहरणातून मराठी निर्मात्यांचे कान टोचत ते म्हणाले, "जेव्हा संजय लीला भन्साली यांचा 'पद्मावत' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' एकाच वेळी येणार होते, तेव्हा त्यांनी आपापसात ठरवून एक आठवड्याचं अंतर ठेवलं. यामुळे दोन्ही सिनेमांच्या सुरुवातीच्या कमाईचा फायदा झाला".
स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना अशोक शिंदे यांनी 'लालबागची राणी' या सिनेमाची आठवण करून दिली. ते म्हणाले, "बोनी कपूर या सिनेमाचे निर्माते होते. जेव्हा कळलं की एकाच दिवशी पाच मराठी सिनेमे येणार आहेत, तेव्हा मी स्वतः चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून इतर निर्मात्यांना भेटलो. आपण एकेक आठवडा वाटून घेऊ, अशी विनंती मी केली होती. मात्र, 'तुम्ही हिंदीवाल्यांना मदत का करताय?' असा उलट प्रश्न मला विचारला गेला. त्यावर मी म्हटलं, अजिबातच नाही. मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, भाषेचा मला अभिमान आहे. पण यात हिंदी-मराठी असं न करता आपण व्यवसाय म्हणून बघू. कारण यात सगळ्यांचेच पैसे गुंतले आहेत".
...तरच मराठीत 'बाहुबली' होईल
निर्मात्यांनी तडजोड करण्यास नकार दिला होता, हे सांगताना अशोक शिंदे पुढे म्हणाले, "काही निर्मात्यांनी ठामपणे सांगितलं की, आम्ही मराठी माणसं आहोत आणि आमचा सिनेमा 'शोले' आहे, तो चालणारच. शेवटी एकाच दिवशी पाच मराठी सिनेमे आले. त्यात हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूडचेही चित्रपट होते. परिणामी आम्हाला सकाळी ७ किंवा रात्री ११ असे शो मिळाले. हेच रिलीज जर एकेक आठवड्यांत केलं असतं, तर प्रेक्षकांकडेसुद्धा चॉइस असतो. त्यामुळे माझं मत आहे की, आपण विचार करून सिनेमे रिलीज करत नाहीत, तोपर्यंत मराठीत 'बाहुबली' होणारच नाही".