"महाराष्ट्रात, आपल्या भवताली हे घडतंय..." सोनाली कुलकर्णीचा संताप; विचारला 'हा' गंभीर प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:11 IST2026-04-02T13:08:33+5:302026-04-02T13:11:59+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

"महाराष्ट्रात, आपल्या भवताली हे घडतंय..." सोनाली कुलकर्णीचा संताप; विचारला 'हा' गंभीर प्रश्न
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ज्योतिष असल्याची बतावणी करत अशोक खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. त्याने केवळ महिलांवर अत्याचारच केले नाहीत तर त्याच्याकडे येणाऱ्यांची आर्थिक फसवणूकही केली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर संताप व्यक्त केला जात आहे. काही सेलिब्रिटींनीही अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने विचार करायला लावणारी पोस्ट शेअर केली आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रोखठोक मत मांडलं. तिनं लिहलं, "आता तरी श्रध्दा आणि अंधश्रद्धा ह्यातला फरक समजून घेऊया. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक खुळाचार, आर्थिक फसवणूक, ऐय्याशी, भावनिक शोषण, दांभिकता, किती संतापजनक, केवढी पिळवणूक. अजूनही आपण म्हणणार का की आमच्याच धर्मातली अंधश्रध्दा का दिसते", असा सवाल तिनं केला.
तिने पुढे संताप व्यक्त करताना म्हटले, "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको? की माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी? महाराष्ट्रात, आपल्या भवताली हे घडतंय... आपण ठगले जातोय... जागे होऊया", असे आवाहन करत तिने सामान्य नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला.
दरम्यान, लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अशोक खरातचा ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीतच मुक्काम राहणार आहे. गुप्तधन मिळेल, आयुष्यात प्रगती होईल किंवा अपत्यप्राप्ती होईल, आर्थिक अडचणीतून बाहेर याल, पतीला नोकरी लागेल, मनासारखा पती मिळेल हे प्रश्न घेऊन भोंदू अशोक खराकडे जाणाऱ्या महिलांची संख्या ८० टक्के होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. व्यापाऱ्यात प्रगती होत नाही, नोकरीत प्रमोशन हवं, राजकरणात महत्त्वाचे पद कधी मिळेल, उमेदवारी मिळविण्यासाठी उपाय हे प्रश्न घेऊन व्यापारी, उच्च पदस्थ अधिकारी, राजकीय मंडळी भोंदू खरातच्या पायऱ्या झिझवत असत, असेही उघडकीस आले आहे.