गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव
By कोमल खांबे | Updated: June 11, 2025 14:11 IST2025-06-11T14:10:40+5:302025-06-11T14:11:07+5:30
'जारण' सिनेमाच्या निमित्ताने अनिता दातेने तिला आलेले भयानक अनुभव शेअर केले आहेत.

गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव
अनिता दाते आणि अमृता सुभाष यांच्या मुख्य भूमिका असलेला 'जारण' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. काळी जादू आणि कर्मकांडावर आधारित असलेल्या या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाच्या भयाण ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. जारण सिनेमाच्या निमित्ताने अनिता दातेने तिला आलेले भयानक अनुभव शेअर केले आहेत.
अनिता दाते हिने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने नाटकाच्या दौऱ्यांदरम्यान तिला आलेले अनुभव सांगितले. अनिता म्हणाली, "नाटकाच्या दौऱ्यासाठी आम्ही निघालो होतो. लातूरमध्ये प्रयोग होता. आणि लातूरवरुन आम्हाला विदर्भात जायचं होतं. रस्त्यावरुन जाताना पहाटे ३.३० वाजता एक बाई दिसली. ती एकटीच चालली होती आणि ती रडत होती असं वाटत होतं. मी आणि माझी मैत्रीण तेव्हा ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो. आम्ही त्या ड्रायव्हरला म्हटलं की थांबा ना, ती बाई अशी चाललीये. त्यावर कोणीच काही बोललं नाही. आणि गाडी पुढे गेली".
गोव्यातही चकवा लागल्याचा अनुभव घेतल्याचं अनिताने सांगितलं. "तसंच गोव्यावरुन येताना तेव्हा आशालता वाबगावकर गाडीत होत्या. तेव्हा चकवा लागल्यासारखं झालं आणि गाडी तिथेच फिरत होती. गोव्यातून आम्ही बाहेरच पडत नव्हतो. मग आशाताईंनी गाडीतून सगळ्यांना बाहेर उतरवलं. आणि मग आम्ही सगळे गाडीच्या समोर उभे राहिलो. त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले आणि मग नारळ फोडला आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो आणि गाडी निघाली. त्यानंतर आम्ही मग कोकणात शिरलो", असं अनिताने सांगितलं.